
विदर्भात परदेशी पाहुण्यांची तुरळक हजेरी! हवामान बदल, अधिवास हस्तक्षेपाने अडचण; जलाशयावर शुकशुकाट
दरवर्षी हजारोंच्या संख्येने शेकडो स्थलांतरीत पक्षी दूरवरचा प्रवास पूर्ण करीत विदर्भातील जलाशयांवर विसावतात. यंदाही काही प्रजातींनी जलाशयांवर हजेरी लावली आहे. मात्र फेब्रुवारी अर्धा संपत आला असला तरी दरवर्षी लागणारी परदेशी पाहुण्यांच्या हजेरीत हवी तशी वाढ अजून झालेली नाही. केवळ अकोलाच नव्हे तर संपूर्ण विदर्भाची ती अवस्था असून हवामान बदल, पक्षी अधिवास अन् जलाशय परिसरातील वाढता मानवी हस्तक्षेप ही त्याची प्रमुख कारणे असल्याचे बोलले जात आहे.(फोटो सौजन्य – istock)
सार्वजनिक वाचनालयाच्या तिजोरीत ऐतिहासिक ठेवा, भंडाऱ्यात सापडली शिवरायांच्या काळातील दुर्मिळ ‘होन’
दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात देश विदेशातील पक्षी विदर्भातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमधील जलाशयांवर मोठ्या संख्येने हजेरी लावतात. या स्थलांतरीत पक्ष्यांची पक्षी निरीक्षक, अभ्यासक, छायाचित्रकार व निसर्गप्रेमी आतुरतेने प्रतीक्षा करतात. यंदा स्थलांतरणाला काहीशा उशिराने सुरुवात झाली आहे. अगदी बोटांवर मोजण्या इतक्या स्थलांतरीत पक्षी प्रजातींनी जलाशयांवर हजेरी नोंदवली. सुरुवातीला थंडी कमी पडल्याने व अजून अवधी असल्याने त्यांच्या संख्येत वाढ होईल, अशी अपेक्षा पक्षीतज्ञांकडून वर्तविण्यात आली होती, मात्र तसे घडून आले नाही. आता फेब्रुवारी महिना संपत आला असला तरी फारश्या पक्षी प्रजातींची हजेरी जलाशयांवर लागलेली नाही.
अकोल्यात जेमतेम पक्षी अकोला वा जिल्ह्यात पोपटखेड, काटेपूर्णा, दगडपारवा, कापशी, सिसा-मासा-उदेगाव, विझोरा, दुधाळा, आगर, आखतवाडा आदी जलाशयांवर दरवर्षी स्थलांतरी पक्षी हजेरी लावतात. यंदाही काही पक्ष्यांनी हजेरी लावली असली तरी त्यांची संख्या अन् प्रजाती या बोटांवर मोजण्या इतक्या आहेत. पेन्टेट स्टॉर्क, रेड क्रिस्टेड पोचार्ड, लेसर विसलिंग , कॉम्ब डक, ब्राम्हणी, स्पॉटबिल यासारख्या पक्ष्यांचे दर्शन या पाणथळांवर घडते आहे. तर पूर्वी फ्लेमिंगो, कॉमन क्रेन, ग्रे हेडेड लॅपविंग, नॉदर्न शॉवलर, गडवाल, कॉमन पोचार्ड, बार हेडेड गूज यासारख्या पक्ष्यांचे दर्शन घडत होते.
दरवर्षी शहरानजिकच्या पाणथळ स्थळी आपण स्थलांतरीत पक्ष्यांच्या निरीक्षणासाठी भेटी देत असतो. मात्र शहरानजिकची जलाशये वाढता मानवी हस्तक्षेप अन् प्रदुषणामुळे पक्ष्यांसाठी अयोग्य ठरत आहेत. प्लास्टिकचा अवाजवी वापर, श्वानांचा वाढता हैदोस, मानवी हस्तक्षेप, प्रदूषण आदींमुळे या जलाशयांकडे स्थलांतरीत पक्ष्यांनी पाठ फिरवली आहे. भविष्यात या पाणथळांचे संरक्षण करण्यासाठी वाढते प्रदुषण रोखणे अत्यंत गरजेचे आहे.डॉ. जयंत वडतकर,अध्यक्ष महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना, असे मत व्यक्त केले आहे.