पांढऱ्या किडीचा प्रादुर्भावाने ऊसपीक धोक्यात! वाढ खुंटल्याने पाने पिवळी; उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती
परिसरातील ऊस पिकावर पांढऱ्या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. किडीमुळे उसाची वाढ खुंटून पाने पिवळी पडत आहेत. प्रादुर्भाव वेळीच नियंत्रणात न आल्यास उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. शेंबाळपिंपरी परिसरात इसापूर धरणाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. ऊस हे नगदी पीक असल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करतात. परिसरापासून सहा ते ३० किलोमीटरच्या अंतरात दोन-तीन साखर कारखाने असल्याने ऊस उत्पादकांना बाजारपेठही उपलब्ध आहे. मात्र, सध्या पिकावर पांढऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.(फोटो सौजन्य – istock)
सध्या ऊस पीक उंच वाढले आहे. त्यामुळे पारंपरिक फवारणी यंत्राद्वारे शेतात जाऊन औषध फवारणी करणे कठीण झाले आहे. मजुरांकडून फवारणी केल्यास उसाचे धांडे मोडण्याची शक्यता आहे. तसेच कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पांढऱ्या किडीच्या प्रादुर्भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून, त्यावर कोणती औषधे व कोणत्या पद्धतीने फवारणी करावी, याबाबत कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी विभाग तसेच परिसरातील साखर कारखान्यांच्या कृषी विभागाने संयुक्तपणे उपाययोजना कराव्यात. उंच वाढलेल्या उसावर प्रभावीपणे फवारणी करण्यासाठी ड्रोन फवारणी यंत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. किडीचा प्रादुर्भाव वेळीच रोखला नाही तर ऊस उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनाने तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






