४३ हजार शेतकरी झाले कर्जमुक्त! ३७४ कोटी ३१ लाख रुपये खात्यात जमा; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास सुरुवात झाली असून, योजनेमध्ये एकूण १ लाख ६२ हजार १४४ शेतकरी पात्र ठरले आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ४३ हजार ६४७ शेतकऱ्यांच्या खात्यात ३७४ कोटी ३१ लाख ४३ हजार ४८१ रुपयांचा लाभ थेट जमा करण्यात आला आहे.(फोटो सौजन्य – istock)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट कर्जमुक्तीचा निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ४३ हजार ६४७ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ३७४ कोटी ३१ लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. मात्र, जिल्ह्यात योजनेसाठी १ लाख ६२ हजार १४४ शेतकरी पात्र असताना प्रशासनाकडे अद्याप १ लाख ८१४ शेतकऱ्यांचीच यादी उपलब्ध झाली आहे. अद्यापही पात्र शेतकऱ्यांना लाभाची प्रतीक्षा कायम आहे. फार्मर आयडी, आधार प्रमाणीकरण तसेच इतर तांत्रिक प्रक्रियेमुळे कर्जमुक्तीची गती मंदावल्याचे चित्र आहे. योजनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बँकेच्या ३३ हजार ६३१ शेतकऱ्यांच्या खात्यात २५३ कोटी ८२ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. तर राष्ट्रीयकृत बँकांतील १२ हजार १६ शेतकऱ्यांच्या खात्यात १२० कोटी ४८ लाख रुपये असे एकूण ४३ हजार ६४७शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत. मात्र, पात्र शेतकऱ्यांची संख्या आणि प्रत्यक्ष खात्यात निधी जमा झालेल्या शेतकऱ्यांची संख्या यामध्ये तफावत आहे.
१ लाख ६२ हजार १४४ शेतकरी पात्र ठरले असताना त्यापैकी केवळ ४३ हजार ६४७शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. तसेच यादीतील ८२ हजार ९८२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे, तर १७ हजार ८३२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप प्रलंबित आहे. कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी फार्मर आयडी महत्त्वाचा ठरत असून, फार्मर आयडी उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्यांची प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. जिल्ह्यात आजघडीला २२ हजार ६७० शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही तर काही शेतकऱ्यांच्या नावातील फरक, आधार व बँक खात्यातील माहितीतील विसंगती, चुकीचे किंवा निष्क्रिय बँक खाते, कर्ज खात्याची माहिती आणि आधार प्रमाणीकरण प्रलंबित राहणे, ही निधी जमा न होण्यामागील प्रमुख कारणे आहे.
कर्जमुक्तीचा लाभ मिळाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. कर्जमाफीमुळे जुन्या थकबाकीचे ओझे कमी झाले. मात्र अनेक बँकांनी जुने कर्ज असल्याने नविन पीककर्जासाठी हात आखडता घेतला होता, आगामी खरीप व रब्बी हंगामात कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने कर्जपुरवठ्याची अपेक्षा आहे. नव्या कर्जपुरवठ्याची अपेक्षा आहे.
66 मागील दोन वर्षात काहीच पिकपाणी झाले नाही. सततच्या नुकसानीमुळे कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि आर्थिक परिस्थितीही बिकट झाली होती. अशा वेळी या कर्जमाफीमुळे काही का होईना, पण मोठा दिलासा मिळाला आहे. किमान जुन्या कर्जाचे ओझे काही प्रमाणात कमी झाले आहे. आता नव्या हंगामाची सुरुवात तरी थोड्या आशेने करता येईल. शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत असल्याने मोठा दिलासा मिळत आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासह शेतकऱ्यांनीही आधार प्रमाणिकरण तसेच ई-केवायसी त्वरीत करावी.






