ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे: पालिकेने नागरिकांच्या आरोग्यासाठी काही उपक्रम राबविले होते. दिवा शहरातील ‘आपला दवाखाना’ हा ठाणे महानगरपालिकेमार्फत चालविण्यात येणारा महत्त्वाचा आरोग्य सेवा उपक्रम कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आला असून या निर्णयामुळे दिव्यातील पाच लाखांहून अधिक नागरिकांच्या आरोग्य हक्कावर गदा आली आहे. याआधीच फिरता दवाखाना बंद करून नागरिकांना आरोग्य सेवेपासून वंचित करण्यात आले होते आणि आता ‘आपला दवाखाना’ही बंद करून महानगरपालिकेने स्वतः दिलेल्या लिखित आश्वासनाचे उल्लंघन केले आहे.
आरोग्य ही घटना प्रदत्त मूलभूत हक्कांपैकी एक असून राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत जीवनाचा व आरोग्याचा हक्क अबाधित आहे. तसेच महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य अधिनियम, 1949 आणि महाराष्ट्र नगरपालिकेचा कायदा यांनुसार ठाणे महानगरपालिकेवर नागरिकांना किमान आरोग्य सेवा पुरविण्याची वैधानिक जबाबदारी आहे. दिव्यातील नागरिकांकडून नियमित मालमत्ता कर व स्थानिक कर आकारले जात असूनसुद्धा आरोग्य सेवा न पुरविणे हे सार्वजनिक निधीचा दुरुपयोग व नागरिकांच्या हक्कांचा भंग आहे. या निष्काळजी व बेकायदेशीर कृतीमुळे भारतीय दंड संहिता कलम 166, 269, 336 आणि 304A अंतर्गत जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दिव्यात स्थायी दवाखाना व २४x७ प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होईपर्यंत ‘आपला दवाखाना’ अखंडित सुरू ठेवणे आणि वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने आपत्कालीन सुविधा तसेच आवश्यक वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची तातडीची जबाबदारी आहे. अन्यथा दिव्यातील नागरिकांना न्याय मिळविण्यासाठी आंदोलनात्मक पावले उचलावी लागतील तसेच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा पर्याय खुला राहील, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) कल्याण – कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी दिला आहे. यावेळी निवेदन देताना कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे शहर प्रमुख सचिन पाटील महिला शहर संघटिका ज्योती पाटील युवा सेना अधिकारी अभिषेक ठाकूर विभाग प्रमुख रवी रसाळ नागेश पवार आकाश विचारे विकी मंचेवार आदी उपस्थित होते.