ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : नवीन ठाणे स्टेशन, सॅटिस पूर्व प्रकल्प यासारखे अनेक ठाण्यातील प्रकल्प टक्केवारीच्या नादात रखडले आहेत. या प्रकल्पांना चालना देण्यात सत्ताधारी सपशेल अपयशी झाले असल्याचा आरोप शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे. सोमवारी सॅटिस पूर्व प्रकल्पाचे गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी राजन विचारे यांनी केली त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार टीका केली आहे.
शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या सॅटिस 2 प्रकल्प या प्रकल्पातील कोपरी रेल्वे पुलावरील गर्डरचे टाकण्याचे काम गेले दोन दिवस सुरू आहे. विचारे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेचे अधिकारी, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांच्यासोबत पाहणी दौरा आयोजित करून या गर्डरचे काम कितपत पूर्ण झाले आहे याची माहिती घेतली. तसेच सत्तेत असणाऱ्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन आढवा घेतला नाही आणि साधी पाहणी देखील केली नसल्याने विचारे यांनी खंत व्यक्त केली. कारण शिंदे गटाचे राजकारण फोडाफोडी, दमबाजी यात व्यस्त असल्याने त्यांना विकासाचे काहीही पडले नसल्याचा आरोप विचारे यांनी केला.
वाहतूक कोंडी लवकरच सुटणार
4.50 मीटर च्या पाच गर्डर असून हे गर्डर टाकण्याचत आले आहेत. त्यावर स्टील काँक्रीट करून हा पूल एकमेकांना जोडून 2.24 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मार्ग तयार होणार आहे. त्यामुळे ठाणे पूर्व स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे. सदर प्रकल्प सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन शिवसेना नेते राजन विचारे यांना अधिकाऱ्यांनी दिले आहे.
प्रकल्पाची थोडक्यात माहिती
प्रकल्पाला सण2018 साली मंजुरी मिळाली. त्यानंतर या प्रकल्पाला स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश करून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे व तत्कालीन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पाठपुरावा केला. 261 कोटी व रेल्वे पुलासाठी 39 कोटी अशी एकूण 298 कोटी ला मान्यता मिळाली. दिल्लीच्या आयआरडीसी विभागाकडूनही मंजुरी मिळवून घेतली. 19 फेब्रुवारी 2022 रोजी सॅटिस डेकचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रकल्पाचे काम टप्प्याटप्प्यामध्ये सुरू झाले.
या मार्गावर 59 पिलर उभे करण्यात आले. परंतु गेल्या वर्षभरापासून ब्लॉक घेण्यासाठी रेल्वे कडे पाठपुरावा नसल्याने गर्डर टाकण्यास विलंब लागला होता. सध्याचे खासदार संसदेत फोटो काढण्यात व्यस्त आहेत बहुतेक त्यांना विकास कामांकडेही लक्ष देण्यास वेळ नसावा असा आरोप शिवसेना नेते राजन विचारे यांनी केला आहे.