‘यूपी-बिहारच्या मतांसाठी मराठीचा अपमान खपवून घेणार नाही’; अविनाश जाधवांचा भाजप-शिंदे गटावर हल्लाबोल
मराठी भाषेच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात वेगळी भूमिका आणि उत्तर प्रदेश-बिहारमधील राजकारणासाठी वेगळी भूमिका घेतली जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला. भाजपला मतदान करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने गोरेगाव-कुर्ला येथे झालेला जल्लोष पाहावा, असे आवाहन करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“यूपीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी भाषेचा अपमान सुरू आहे का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी याचे उत्तर द्यावे,” अशा शब्दांत जाधव यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
भाजप आणि शिंदे गटाच्या राजकारणावर टीका करताना जाधव यांनी दोन्ही पक्षांमध्ये संगनमत असल्याचा आरोप केला. “भाजप आणि शिंदे गटांनी मिळून एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसऱ्याने रडल्यासारखे करायचे. यूपी-बिहारच्या मतदारांना खूश करण्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचा हा प्रकार आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा प्रश्न केवळ निवडणुकीपुरता किंवा राजकीय सोयीनुसार हाताळला जाऊ नये, अशी भूमिका जाधव यांनी मांडली.
मुख्यमंत्रीपदावरूनही अविनाश जाधव यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. “स्वतःच्या ताकदीवर नव्हे, तर दुसऱ्याने बसवलेल्या मुख्यमंत्र्यांना स्वतःचा स्वाभिमान उरत नाही,” असा थेट टोला त्यांनी लगावला. मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्द्यावर सरकारने ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मनसे नेते अभिजीत राणे यांच्यावरही जाधव यांनी जोरदार टीका केली. “अभिजीत राणेंनी चादर बघून पाय पसरावेत; त्यांच्यासाठी आमचा विभाग अध्यक्षच पुरेसा आहे,” असा टोला लगावत त्यांनी राणे यांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला.
दरम्यान, मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या मीरा-भाईंदर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांशी संवाद, सदस्य नोंदणी आणि युनिट उद्घाटनासाठी अमित ठाकरे भाईंदर पूर्व येथील शंकर नारायण कॉलेज येथे दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी मनसेकडून मोठी तयारी करण्यात आली असून तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
अमित ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच मराठी भाषा, रिक्षा-टॅक्सीचालकांना देण्यात आलेली मुदतवाढ आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरून मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याने आगामी काळात हा मुद्दा अधिक तापण्याची शक्यता आहे.






