मराठीला अखेर स्थान...! मराठीला डावलल्याचा मुद्दा ‘नवराष्ट्र’ने उचलला; परिवहन सभापतींची निमंत्रण पत्रिका बदलली
महापालिकेच्या प्रशासकीय पदाशी संबंधित कार्यक्रम असल्याने निमंत्रण पत्रिकेत स्थानिक भाषेला, विशेषतः मराठी भाषेला, प्राधान्य असणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त करण्यात आले होते. मात्र, सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या पत्रिकेत मराठीचा वापरच नसल्याने मराठी भाषिक नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. हा केवळ भाषेचा प्रश्न नसून महापालिकेच्या कार्यक्रमांमध्ये स्थानिक भाषेला दिल्या जाणाऱ्या स्थानाचा प्रश्न असल्याची भूमिका मराठी भाषेच्या समर्थकांकडून मांडण्यात आली.
परिवहन सभापतींच्या निमंत्रण पत्रिकेत मराठी हद्दपार; नावांमध्येही चुका, भाजप प्रोटोकॉलला बगल!
सुरुवातीच्या निमंत्रण पत्रिकेवर केवळ हिंदी भाषेचा वापर करण्यात आल्याने सर्वप्रथम मराठी भाषेला डावलल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर पत्रिकेतील पदाधिकाऱ्यांच्या नावांचा क्रम आणि काही नावांच्या स्पेलिंगमधील चुका देखील चर्चेत आल्या.
विशेषतः भाजपच्या जिल्हाध्यक्षांचे नाव पत्रिकेत सर्वात खालच्या क्रमांकावर देण्यात आल्याचा आक्षेप घेण्यात आला. त्याचवेळी लल्लन तिवारी यांचे नाव त्यापेक्षा वरच्या क्रमांकावर असल्याने पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नावांचा क्रम ठरवताना प्रोटोकॉलचा विचार करण्यात आला होता का, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
महापालिकेतील भाजपचे स्थायी समिती सभापती हसमुख गहलोत यांच्या नावातही चूक असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले होते. ‘गहलोत’ऐवजी ‘महलोत’ असा उल्लेख झाल्याने निमंत्रण पत्रिका छपाईपूर्वी पदाधिकाऱ्यांच्या नावांची पडताळणी करण्यात आली होती का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
निमंत्रण पत्रिकेतील या त्रुटी आणि मराठी भाषेला न दिलेल्या स्थानाबाबत दैनिक नवराष्ट्रने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर हा मुद्दा अधिक चर्चेत आला. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मराठी एकीकरण समितीनेही या प्रकाराची गंभीर दखल घेत परिवहन सभापती राजकुमार मिश्रा यांच्यावर निशाणा साधला. समितीचे उपाध्यक्ष प्रमोद पार्टे यांनी या प्रकाराबाबत आक्रमक भूमिका घेत महापालिकेच्या कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेला प्रथम प्राधान्य देण्याची मागणी केली.
“मीरा-भाईंदर शहरामध्ये जाणूनबुजून मराठीला डावलले जात आहे का? महापालिकेच्या कार्यक्रमात मराठी भाषेला प्रथम प्राधान्य द्यावे. निमंत्रण पत्रिकेतील झालेली चूक तातडीने सुधारून नवीन पत्रिका मराठीत काढावी आणि झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागावी,” अशी मागणी प्रमोद पार्टे यांनी केली होती.
मराठी एकीकरण समितीने केवळ नाराजी व्यक्त न करता कार्यक्रमाबाबत थेट इशाराही दिला होता. “चूक सुधारली नाही आणि मराठीला योग्य स्थान दिले नाही, तर हा उद्घाटन कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा प्रमोद पार्टे यांनी दिल्याने प्रकरण अधिक तापले होते. त्यामुळे उद्घाटन सोहळ्यापूर्वीच निमंत्रण पत्रिका हा राजकीय आणि सामाजिक चर्चेचा विषय बनला. महापालिका प्रशासन, सत्ताधारी पक्ष आणि संबंधित पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, नवराष्ट्रच्या वृत्तानंतर आणि मराठी एकीकरण समितीने भूमिका घेतल्यानंतर परिवहन सभापतींच्या कार्यालयाकडून निमंत्रण पत्रिकेत बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुधारित पत्रिकेत मराठी भाषेला स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे मराठी एकीकरण समितीने केलेल्या मागणीचा परिणाम झाला का, असा प्रश्न उपस्थित होत असून समितीच्या भूमिकेला यश आल्याचे समर्थकांकडून सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या पत्रिकेतील वादग्रस्त बाबींनंतर करण्यात आलेल्या बदलांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
निमंत्रण पत्रिकेत झालेल्या बदलानंतर आता हा बदल नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला, याची चर्चा सुरू झाली आहे. नवराष्ट्रच्या बातमीनंतर आणि मराठी एकीकरण समितीच्या इशाऱ्यानंतर पत्रिका बदलण्यात आल्याने या संपूर्ण प्रकरणात माध्यमांच्या वृत्तांकनाचा आणि सामाजिक दबावाचा परिणाम झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महापालिकेच्या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकांमध्ये मराठी भाषेला योग्य स्थान मिळावे, पदाधिकाऱ्यांच्या नावांचा क्रम प्रोटोकॉलनुसार असावा आणि नावांमध्ये कोणत्याही प्रकारच्या चुका होऊ नयेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वीच निमंत्रण पत्रिकेवरून निर्माण झालेला हा वाद आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सुरुवातीच्या पत्रिकेतील त्रुटींनंतर करण्यात आलेल्या सुधारणांमुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी भविष्यात अशा बाबींकडे अधिक गांभीर्याने पाहणार का, याकडे मीरा-भाईंदरकरांचे लक्ष लागले आहे.






