अमित ठाकरे यांची अमित साटम यांच्यावर जहरी टीका
नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. पाचपावली परिसरातील सिंधू महाविद्यालयाला भेट देत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच मनसे विद्यार्थी सेनेच्या सभासद नोंदणी मोहिमेची पाहणी केली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध राजकीय आणि विद्यार्थी प्रश्नांवर भाष्य केले.
यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्या मराठी भाषेसंदर्भातील भूमिकेवर केलेल्या टीकेबाबत अमित ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. राज ठाकरे यांनी आपल्या नातवाला बालमोहन विद्यालयात प्रवेश द्यावा आणि त्यानंतर मराठीच्या मुद्द्यावर बोलावे, असे आव्हान साटम यांनी दिले होते.
अमित साटम यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली. “अमित साटम यांना भुंकायलाच ठेवलंय. ते काम ते उत्तम करत आहेत. तेच त्यांचं काम आहे,” अशी बोचरी टीका त्यांनी केली.
पुढे त्यांनी साटम यांच्या वक्तव्यावर सवाल उपस्थित केला. लोकांच्या मृत्यूवर हसल्याचा आरोप करत, “तो माणूस ठरवणार का माझा मुलगा कुठल्या शाळेत जायला पाहिजे?” असा सवाल अमित ठाकरे यांनी केला.
अमित ठाकरे यांनी नागपुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या सभासद नोंदणी मोहिमेची माहिती घेतली. मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि नाशिकनंतर नागपुरातही विद्यार्थी संघटना मजबूत करण्यासाठी आपण दौरा करत असल्याचे त्यांनी सांगितले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपण संवाद साधत असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी केवळ सेल्फी घेण्याऐवजी आपल्या अडचणी आणि प्रश्न मांडावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
महाविद्यालयातील स्वच्छतागृहाच्या परिस्थितीचाही त्यांनी उल्लेख केला. विद्यार्थिनी आपल्या समस्या मोकळेपणाने सांगत नसल्याची खंत व्यक्त करत, विद्यार्थ्यांनी प्रश्न मांडल्यास संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Sushma Andhare News: जिल्हा शल्यचिकित्सकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही? ; सुषमा अंधारे आक्रमक
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही अमित ठाकरे यांनी भाष्य केले. सरकारला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचा आरोप करत त्यांनी प्रलंबित निधी आणि संबंधित निर्णयांचा मुद्दा उपस्थित केला. याशिवाय पेपरफुटीच्या घटनांवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. पेपरफुटी रोखण्यासाठी ठोस काम कधी सुरू होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तरुण पिढी अत्यंत जागरूक असून त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत, असेही अमित ठाकरे म्हणाले.
नागपूर दौऱ्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेण्यावर आपला भर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात मनसे विद्यार्थी सेनेची संघटनात्मक बांधणी अधिक आक्रमकपणे करण्याचे संकेत त्यांच्या दौऱ्यातून मिळाले आहेत.






