
मोठी खुशखबर! 'या' ठिकाणी Metro चे नेटवर्क जोडले जाणार; प्रताप सरनाईक काय म्हणाले?
मुंबईनंतर आता ३ शहरांमध्ये पॉड टॅक्सी प्रकल्प
एमएमआरमधील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येतून दिलासा
परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली माहिती
मुंबई: मुंबई एमएमआरमधील नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येतून दिलासा देण्यासाठी पर्यायी वाहतूक साधनांवर भर दिला जात आहे. दहिसर ते मीरा भाईंदरमधील काशीगावपर्यंत मेट्रो सुरू झाल्यानंतर आता ठाणे ते मीरा भाईंदरला मेट्रोने जोडण्याच्या कामाला वेग आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास लवकरच सुखकर आणि वेगवान होणार आहे. तसेच मेट्रोमुळे वेळेची देखील बचत होणार असून, वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे.
गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मेट्रो-१०
ठाणे-मीरा भाईंदर परिसरात वाढणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य सरकारने गायमुख रेतीबंदर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (घोडबंदर) पर्यंत मेट्रो-१० प्रकल्पाची योजना आखली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, आता मेट्रो १० प्रकल्प फास्ट ट्रॅकवर आणण्याचा निर्णय झाला आहे. ठाणे मीरा भाईंदरमध्ये मेट्रो रोड इन्फ्राच्या बाबतीत एमएमआरडीए अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
९.७ किमी लांब एलिव्हेटेड मेट्रो
काशीगाव ते दहिसर चेक नाका पर्यंत मेट्रो कनेक्ट झाल्यानंतर आता ठाण्याच्या गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत ९.७ किमी लांब एलिव्हेटेड मेट्रो प्रकल्पासाठी टेंडर प्रक्रिया पुढच्या आठवड्यात सुरू केली जाईल. परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून एमएमआरडीएमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. दहिसर-काशीगाव रूट वाढवून गायमुखपर्यंत नेला जाईल. हा प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारे घाटकोपर ते ठाणे कासारवडवली-गायमुख आणि मीरा भाईंदर मेट्रो एकमेकांशी जोडली जाईल.
पॉड टॅक्सीचा डीपीआर
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, मुंबईत कुर्ला ते बीकेसी पर्यंत पॉड टॅक्सी प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. आता ठाणे, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईत पॉड टॅक्सी प्रकल्प पीपीपी (PPP) तत्त्वावर लागू करण्याचा प्लॅन आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) पुढच्या सहा महिन्यांत पूर्ण होईल.
३० ऐवजी ६० मीटर रस्ता
घोडबंदर रोडवरील मोठी वाहतूक कोंडी लक्षात घेता, ३० मीटर रुंद रस्ता ६० मीटर रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गायमुख आणि काशीगाव दरम्यान सुमारे ५.५ ते ६ किमी रुंद रस्त्यासाठी लागणारी जमीन एमएमआरडीएच्या माध्यमातून खरेदी केली जाईल.
Mumbai Metro : मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात बदल, मेट्रो 9 आणि 2B कधी सुरु होणार? जाणून घ्या तारीख
त्याचबरोबर ठाणे आणि मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील वेगवेगळ्या रस्ते प्रकल्पांसाठी लवकरच टेंडर प्रक्रिया देखील सुरू होईल. सरनाईक यांनी सांगितले की, घोडबंदर रोडवर रुंदीकरणाचे काम मान्सूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महावितरणचे पोल शिफ्ट करण्याचे कामही पुढच्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.