
शेतकऱ्यांना आर्थिक फटका! भाजी मार्केटवर युद्धाचं सावट, काकडी, दुधी, कारल्याचा साठा वाढला (फोटो सौजन्य-Gemini)
बाजारात पुरवठा वाढल्यामुळे व्यापाऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. निर्यात थांबल्यामुळे व्यापाऱ्यांबरोबरच शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसत आहे. निर्यातीसाठी पिकवलेला माल स्थानिक बाजारातच विकावा लागत असल्याने त्यांना कमी दरात व्यवहार करावे लागत आहेत. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि व्यापारी दोघेही सध्या चिंतेत असल्याचे बाजारातील चित्र आहे.
भाजी विक्रेत्यांच्या मते, निर्यात पुन्हा सुरू झाली नाही तर पुढील काही दिवसांत दर आणखी घसरण्याची शक्यता आहे. बाजारात मालाचा साठा वाढत असल्याने विक्री कमी दरात करावी लागत आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी नव्याने माल खरेदी करताना सावध भूमिका घेतली असून, साठा कमी करण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, परिस्थिती लवकर सुधारेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पुन्हा खुली होईल, अशी अपेक्षा शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करत आहेत. अन्यथा भाजीपाल्याच्या दरातील ही घसरण कायम राहिल्यास उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
दरम्यान इराण-इस्रायल युद्धाची झळ आता थेट ठाण्यातील भाजी बाजाराला बसू लागली आहे. आखाती देशांना होणारी कच्च्या मालाची निर्यात पूर्णपणे थांबल्यामुळे, निर्यातीसाठी असलेला माल स्थानिक कृषी उत्पादन बाजारात पडून आहे. यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक प्रचंड वाढली असून, भावातही लक्षणीय घट झाली आहे. मात्र, दुसरीकडे, वाढत्या भावांमुळे विक्रेते चिंतेत आहेत, कारण ग्राहक घराबाहेर पडणे टाळत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, केवळ निर्यातबंदीमुळेच नाही, तर व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल उद्योगालाही फटका बसत आहे. हॉटेल्समध्ये भाजीपाल्याच्या पदार्थांचा वापर कमी झाल्यामुळे विक्रीत मोठी घट नोंदवली गेली आहे. यामुळे शेतकरी आणि व्यापारी या दोघांनाही दुहेरी फटका बसला आहे.