
शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. भाजपाकडून आमदार नरेंद्र मेहता यांना ‘मेट्रो मॅन’ म्हणून दर्शवणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. या पोस्टर्समध्ये मेट्रो प्रकल्पासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दुसरीकडे, शिवसेनेकडून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे ‘मेट्रो मॅन’ म्हणून मोठ्या प्रमाणावर बॅनर्स झळकत आहेत. सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मेट्रो प्रकल्पाला गती मिळाल्याचा दावा शिवसेनेच्या बॅनर्समधून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर मनसेने दोन्ही पक्षांवर जोरदार टीका करत श्रेयवादाच्या राजकारणाला विरोध दर्शवला आहे. “मेट्रो प्रकल्प हा अनेक वर्षांच्या नियोजन, प्रशासनिक प्रक्रिया आणि करदात्यांच्या पैशातून साकार झालेला आहे. त्यामुळे एका व्यक्तीला ‘मेट्रो मॅन’ म्हणून प्रोजेक्ट करणे चुकीचे आहे,” असे मनसेने स्पष्ट केले. तसेच “नेमका मेट्रोचा खरा शिल्पकार कोण?” असा थेट सवाल उपस्थित करत मनसेने या मुद्द्यावर जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे म्हटले आहे.
राजकीय पक्षांमधील या स्पर्धेमुळे मेट्रो प्रकल्पाच्या मूळ उद्दिष्टावर पाणी फेरले जात असल्याची भावना काही नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. शहरातील प्रवाशांना दररोज भेडसावणारी वाहतूक कोंडी, गर्दी आणि वेळेचा अपव्यय यावर उपाय म्हणून मेट्रोकडे आशेने पाहिले जात आहे. मात्र, उद्घाटनाआधीच श्रेयासाठी सुरू झालेल्या या राजकारणामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरणही दिसून येत आहे.
तज्ञांच्या मते, काशिगाव ते दहिसर हा मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबईकडे जाणाऱ्या नोकरदार वर्गाला मोठा फायदा होणार आहे. विशेषतः पश्चिम रेल्वेवरील ताण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय, भविष्यातील टप्प्यांमध्ये मेट्रो जाळे विस्तारल्यास मिरा-भाईंदर शहराचा एकूणच विकास वेगाने होण्याची अपेक्षा आहे.दरम्यान, प्रशासनाकडून उद्घाटनाच्या तयारीला अंतिम टप्पा गाठला असून सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि प्रवासी सुविधांबाबत विशेष नियोजन करण्यात आले आहे. मेट्रोच्या प्रत्यक्ष सेवेला सुरुवात झाल्यानंतर तिचा प्रवाशांकडून कसा प्रतिसाद मिळतो, तसेच ती शहरातील वाहतूक समस्यांवर कितपत परिणामकारक ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.एकीकडे मेट्रोमुळे विकासाचा मार्ग मोकळा होत असताना, दुसरीकडे श्रेयवादाच्या राजकारणामुळे निर्माण झालेला वाद आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘मेट्रो मॅन’च्या दाव्यांपेक्षा प्रत्यक्षात नागरिकांना मिळणारी सेवा किती प्रभावी ठरते, हेच खरे मोजमाप ठरणार आहे.