
कासच्या बारामाही पर्यटनाचे वन विभागाकडून तीनतेरा? अधिकारी बदलले की नियमही बदलतात
कास पठार : जागतिक वारसास्थळ असलेले आणि सातारा जिल्ह्याचे भूषण असलेले कास पठार. या कास पठारामुळे सातारा जावली तालुक्यात पर्यटनाला चालना मिळाली. लाखो पर्यटकांची पावले कासच्या दिशेने वळू लागली. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये असणारी रंगीबेरंगी फुलांची पर्वणी संपल्यानंतर कासचा अद्भूत निसर्ग पाहण्यासाठी कास पठारावर बारमाही पर्यटन सुरू राहावे, यासाठी कास पठार समिती असेल किंवा स्थानिक ग्रामस्थ प्रयत्नशील आहे.
कासला बारामाही पर्यटन सुरू राहून स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी गेल्या सात-आठ वर्षांपासून कास पठार कार्यकारी समितीच्या पुढाकाराने व वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून सुरू असलेले बारमाही पर्यटनाचे वन विभागाच्या अधिकाऱ्याने तीन तेरा वाजवले असून, पर्यटनासाठी घेतलेली वाहने कास पठारावर किंवा वनविभागाच्या ऑफिसमध्ये धूळखात पडली. यामुळे वन कमिटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली.
कास पठारावर बारमाही पर्यटन चालू राहावे म्हणून तात्कालीन उपवनसंरक्षक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळी जवळजवळ 25 लाख रुपये खर्च करून महिंद्रा गाड्या खरेदी करण्यात आल्या. त्या वेळेपासून कास पठारावर जीप सफारी व इतर पर्यटन सुरू होते. त्यामुळे कास पठार परिसरातील स्थानिक सहा गावातील युवकांना रोजगार उपलब्ध झाला होता. परंतु, अधिकारी बदलले की कास पठारावर नियम बदलत असतात. मोहितेंची बदली झाली की लगेच नवीन अधिकाऱ्यांनी नवीन नियम सुरू केले. तर नंतर काही दिवसांनी हंगाम कालावधी वगळता इतर महिन्यातील पर्यटनच बंद झाले आणि त्याच्यावर भरीस भर म्हणजे 2025 च्या हंगाम कालावधीत अगोदरच्या गाड्या धुळ खात पडल्या.
स्थानिक ग्रामस्थांची सभा न घेता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कास समितीच्या पैशातून चार इलेक्ट्रिकल वाहने विकत घेतली. अगोदरच नगरपालिकेने दिलेले एक इलेक्ट्रिक वाहन कास पठारावर बंद असताना नवीन चार गाड्या खरेदी करण्याचे गौडबंगाल काय? याबाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये संभ्रमवस्था आहे. यासाठी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची सभा घेणे गरजेचे असताना सुद्धा स्वतः मनमानी पद्धतीने इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली आहेत आणि ती वाहने सध्या बंद अवस्थेत असून कास पठारावर धूळ खात पडून आहेत.
हेदेखील वाचा : ‘लाडक्या बहिणी’मुळे अन्य खात्यांवर येतोय आर्थिक ताण; आता योजना बंद होणार का? मंत्री नाईक म्हणाले…