
समस्या तातडीने सोडवा, अन्यथा निलंबनाची कारवाई करणार; प्रताप सरनाईकांचा देवगड आगारातील अधिकाऱ्यांना इशारा
देवगड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यातील सर्व आगारांच्या परिसरात ७८ हजार झाडे लावण्याचा संकल्प राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. रविवारी देवगड आगाराला भेट देऊन त्यांनी बसस्थानकाची सविस्तर पाहणी केली. यावेळी प्रवासी, नागरिक आणि एसटी कर्मचाऱ्यांनी विविध समस्यांचा पाढाच मंत्र्यांसमोर वाचला. यावर तात्काळ दखल घेत संबंधित समस्या सोडवून त्याबाबतचा अहवाल त्वरित सादर करा, अन्यथा निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा सज्जड इशारा सरनाईक यांनी विभाग नियंत्रक व संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
देवगड बसस्थानकाच्या पाहणीदरम्यान स्वच्छता, प्रवाशांसाठीच्या सुविधा तसेच स्थानकातील विविध बाबींविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. एसटी स्थानकांमधील अस्वच्छता दूर करण्यासाठी यांत्रिक झाडूची संकल्पना राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. देवगड आगारातील या दौऱ्यात परिवहन मंत्र्यांनी प्रवासी, नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. तसेच एसटी स्थानकांमधील सुविधा, स्वच्छता आणि प्रशासनातील कार्यक्षमता सुधारण्यासाठी कठोर भूमिका घेतल्याचे या दौऱ्यातून स्पष्ट झाले. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी दुपारी देवगड बसस्थानकाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी आमदार राजन तेली, शिवसेना नेते संजय आग्रे, संदेश पटेल, तालुकाप्रमुख विलास साळसकर, उपसभापती अमोल लोके, विभाग नियंत्रक दीपक घोडे, पंचायत समिती सदस्या सलोनी तळवडेकर, यंत्र अभियंता पांडूरंग वाघमोडे, आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर, स्थानकप्रमुख श्रीकांत सैतवडेकर आदी अधिकारी, कर्मचारी तसेच एसटीच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
स्वच्छतागृहाची पाहणी; अधिकाऱ्यांना खडेबोल
मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील सुलभ शौचालयाची पाहणी केली. यावेळी स्वच्छता कर्मचारी साफसफाई करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावर ‘मंत्री आले म्हणूनच स्वच्छतेचे काम सुरू आहे का?’ असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. बसस्थानकातील स्वच्छतेवर विशेष भर द्या, तसेच प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था, नवीन पंखे, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यानंतर त्यांनी संपूर्ण बसस्थानकाची पाहणी करत बुक स्टॉल आणि पेपर स्टॉललाही भेट दिली. स्टॉलधारकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांच्यासमोर आपल्या समस्या मांडत निवेदन सादर केले. कर्मचारी कमतरता, बसगाड्यांची अवस्था आणि इतर प्रश्नांकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले.
यावर बोलताना सरनाईक यांनी एसटीच्या ताफ्यात आधुनिक इलेक्ट्रिक बसांचा समावेश करण्यावर शासनाचा भर असल्याचे सांगितले. भविष्यात नव्याने उपलब्ध होणाऱ्या गाड्यांमध्ये इलेक्ट्रिक बसेसना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कर्मचाऱ्यांच्या नवीन भरती प्रक्रियेलाही लवकरच गती दिली जाईल, असे त्यांनी नमूद केले. सीएनजी बसांच्या वापराबाबत समाधानकारक अनुभव नसल्याचेही त्यांनी सांगितले. बसस्थानकातील हिरकणी कक्ष अधिक सुसज्ज करणे, कर्मचाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देणे तसेच गरम आणि थंड पाण्याची सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महिला कर्मचाऱ्याला दिलासा; बदलीच्या ठिकाणी तात्काळ कार्यमुक्ती
देवगड आगारात लिपिक पदावर कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्यांनी आपल्या आईच्या गंभीर आजारपणामुळे मुंबई येथे बदलीसाठी अर्ज केला होता. बदलीचे आदेशही प्राप्त झाले होते. मात्र गर्दीचा हंगाम असल्याचे कारण देत त्यांना बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. याबाबत संबंधित महिला कर्मचाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. आईच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन सरनाईक यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देत त्या कर्मचाऱ्याला बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वतः त्या आदेशावर स्वाक्षरी करून महिला कर्मचाऱ्याला तातडीने बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचा मार्ग मोकळा करून दिला.