
अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका; आधीच मजुरांची टंचाई अन् आता पाऊस
मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सोमवारी (दि.30) सायंकाळी अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाली. त्यामुळे कांदा काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली. मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, काठापूर, लाखणगाव, निरगुडसर इत्यादी परिसरात काढून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याला पावसापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ केली.
सध्या कांदा काढणीचा हंगाम सुरू असून आहे. मजुरांची टंचाई असल्यामुळे शेतकरी जास्त मजुरी देऊन कामे करून घेत आहेत. अशातच वातावरणात अचानक बदल होऊन ढग दाटून आले, विजांचा कडकडाट झाला आणि काही ठिकाणी हलका पाऊसही पडला. या बदलामुळे नागरिकांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दुपारनंतरच पावसाची चिन्हे दिसू लागल्याने शेतकऱ्यांनी कांदा झाकण्यासाठी मोठी धावपळ केली. आधीच कांद्याचे बाजारभाव घसरलेले असताना अवकाळी पावसामुळे दुहेरी संकट निर्माण झाले आहे.
अवकाळी पावसाचा फटका कांदा, कांद्याचे बी व इतर भाजीपाला पिकांनाही बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेला शेतकरी अधिक चिंतेत सापडला आहे.
कडाक्याच्या उन्हात निसर्गाचा कोप
गेल्या काही दिवसांपासून सूर्यदेवाने आपला प्रखर प्रकोप दाखवायला सुरुवात केल्याने होरपळून निघालेल्या पिंपरी-चिंचवडकरांना निसर्गाने सुखद धक्का दिला आहे. दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. सकाळपासून असलेल्या उन्हाच्या चटक्यांनंतर दुपारी अडीचच्या सुमारास आभाळ भरून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण झाला असला तरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र मोठी धावपळ उडाली.
Weather Update : देशातील अनेक राज्यांत वातावरणात कमालीचा बदल; काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज