
पुणे : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ(UP CM Yogi Adityanath) यांनी पुण्यातील आळंदी (alandi) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) गुरुंविषयी वक्तव्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामी (Samarth Ramdas Swami) यांनी घडवलं, असे विधान उत्तर योगी आदित्यनाथ म्हणाले. यावर आता राजकीय वादंग निर्माण झाला असून रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या विधानाचा जाहीर निषेध केला आहे. अजित पवार (Ajit Pawar) गट पूर्वी भाजप (BJP) विरोधी भूमिका घेत होते मात्र आता ते भाजपाबरोबर गेले आहेत, त्यामुळे ते आता काय भूमिका घेणार? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातील आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली. रोहित पवार म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंऐवजी तिसऱ्याच व्यक्तीने घडवलं, असं कुणी म्हणत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो.” योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचे अजित पवार भाजपसोबत आहेत म्हणून समर्थन करणार की आपल्या भूमिकेशी ठाम राहून विरोध करणार याकडे रोहित पवारांनी लक्ष वेधले. रोहित पवार म्हणाले, “योगी आदित्यनाथ यांचा निषेध नोंदविण्यासाठी उपमुख्यमंत्री आळंदीच्या कार्यक्रमावर बहिष्कार घालणार की तिथे जाणार? हे आता पुढच्या काळात दिसेलच” असे मत रोहित पवारांनी व्यक्त केले. त्याचबरोबर आगामी निवडणूकांमध्य़े अजित पवार हे आपल्याच घरातील उमेदवारांना संधी देणार आहेत.यावरुन देखील रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली.
घरातीलच व्यक्तीला अजित पवार उमेदवारी देण्याच्या चर्चा सुरु असल्यामुळे रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला. रोहित पवार म्हणाले, अजित पवार आता बदलले आहेत. त्यांच्या गटातील काही नेते मला भेटले आणि त्यांनी सध्याच्या राजकीय वातावरणाबाबत माहिती दिली. अजित पवार लोकसभेला घरातल्याच व्यक्तीला संधी देतील. तसेच राज्यसभेसाठीही घरातीलच उमेदवाराला संधी देणार आहेत, असे बोलले जात आहे. शेवटी अजित पवार त्या पक्षाचे मालक आहेत, त्यामुळे ते ठरवतील तसा निर्णय होईल. मागच्या आठवड्यात अजित पवार यांनी बारामतीमध्ये जे विधान केले, ते पाहून दुःख झालं. बदललेले अजित पवार मला पाहायला मिळाले. यावरून असे दिसते की, सुप्रिया सुळेंच्या विरोधात ते घरातीलच उमेदवार देतील. अशा शब्दांत रोहित पवार यांनी अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे.
काय म्हणाले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
योगी आदित्यनाथ हे आळंदीत सुरू असलेल्या गीता- भक्ती अमृत महोत्सवामध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या गुरुंचा उल्लेख केला. योगी आदित्यनाथ म्हणाले, “समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण भारतभर चेतना निर्माण केली. त्या कालखंडात औरंगजेबाच्या सत्तेला आव्हान देत असताना त्यांनी औरंगजेबाला इथे मरण्यासाठी सोडलं. तेव्हापासून आजपर्यंत औरंगजेबाला कुणीही विचारत नाही. ही शौर्य आणि पराक्रमाची धरणी आहे, कारण या मातीत पूज्य संतांचे सानिध्य प्राप्त झाले. मी लहानपणी ज्ञानेश्वरी वाचली होती. अवघ्या वयाच्या 15 व्या वर्षी ज्ञानेश्वरीचे लिखाण करून ज्यांनी 21 व्या वर्षी समाधी स्वीकारली, त्या ज्ञानेश्वर माऊलींचे आज मला दर्शन घेता आले. असे मत योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले.