त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झाला भ्याड हल्लय्चा वडगाव मावळ पत्रकार संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला (फोटो - टीम नवराष्ट्र)
वडगाव मावळ : प्रतिनिधी : पत्रकरांवर हल्ला करण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत आहे. यापूर्वी पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये महिला पत्रकारचा विनयभंग करण्याचा संतापजनक प्रकार घडला. यानंतर आता नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला करण्यात आला. नाशिकमध्ये झालेल्या या भ्याड हल्ल्याचा मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गावगुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. याबाबत मंगळवारी (दि.२४ ) मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे वृत्तांतनासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार योगेश खरे, अभिजीत सोनवणे आणि किरण ताजने यांच्यावर एका ठेकेदाराच्या गुंडांकडून भ्याड हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर आघात झाला असून पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे,सदर आरोपींवर तात्काळ मोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. ए. एस. मल्टी सर्व्हिसेस कंपनीचा संबंधित ठेकेदार याच्याविरोधातही गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी. सदर कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच याबाबत शासनाने त्वरीत व कडक कारवाई करून पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा. अन्यथा न्याय न मिळाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात मराठी पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा इशारा देखील मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तसेच,लोणावळा येथील पत्रकार विशाल पाडाळे यांनी केलेल्या बातमीत छेडछाड करून प्रसारित करण्यात आले आहे. या प्रकरणीही संबंधित इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी मावळ तालुका मराठी पत्रकार संघ, वडगाव शहर पत्रकार संघ, तळेगाव दाभाडे शहर, लोणावळा शहर व तळेगाव दाभाडे प्रेस फाऊंडेशन, देहूरोड पत्रकार संघ, कामशेत पत्रकार संघ, पवनमावळ पत्रकार संघ या विविध पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुणबी नोंदी धारकांबाबत मावळ तहसीलदारांना पत्र
कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी येणारे अडथळे व कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर कमी खर्चात मिळण्यासाठी, मावळातील नागरिकांना त्यांच्या गावातील कुणबी नोंदी शोधून देण्यासाठी मावळ अखंड मराठा समाजाच्या वतीने मावळचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच यासंदर्भात चर्चाही करण्यात आली. मावळ तालुक्यात जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये अनेक गावातील कुणबी नोंदी मोडी लिपीत उपलब्ध आहेत. त्या नोंदी मोडीलिपीत असल्याने अनेकांना त्याबद्दल कल्पना नाही. तसेच मोडी लिपी वाचता येत नसल्याने अनेक अडथळे येत आहेत. जुन्या दस्तांमध्ये आढळलेल्या कुणबी नावापर्यंत पोहचण्यासाठी गाव, देवस्थान, शाळा, वन, नगरपालिका, आरोग्य विभाग व जमीन संदर्भात असलेले टिपण, कडईपत्रक, जन्म-मृत्यू रजिस्टर, वारस रजिस्टर, जंगल गुणाकार बुक, खासरा पत्रक, बोट खत, कुळ रजिस्टर, सूद रजिस्टर हे व्यवस्थितपणे उपलब्ध होत नाहीत. तसेच यातील काही कागदपत्रे गहाळ सुद्धा झालेली दिसत आहेत. काही गावातील हीच कागदपत्रे दुसऱ्या गावातील कागदपत्रात एकत्र झालेली आहेत. ही जुनी कागदपत्रे काढण्यासाठी काही एजंट लोकांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे गोर-गरीब शेतकऱ्यांना हे प्रमाणपत्र काढण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहे म्हणून मावळ मराठा समाजाच्या वतीने काही मागण्या करण्यात आल्या आहेत.