
वर्ध्यात रोजगार निर्मितीला मोठी चालना; ३,०११ कोटींचे सामंजस्य करार, उदय सामंतांचा मोठा विश्वास
Wardha News : जिल्ह्यातील औद्योगिक क्षमता आणि स्थानिक उद्योजकांचा उत्साह लक्षात घेता वर्ध्यात उद्योगवाढीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या विकासाला शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. वर्ध्यात आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत विविध उद्योग समूहांशी तब्बल ३ हजार ११ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीमुळे जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.
जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित या परिषदेला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्यासह जिल्हाधिकारी वान्मथी सी., जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, एमआयडीसी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांच्यासह उद्योग विभागातील अधिकारी आणि उद्योजक उपस्थित होते.
वर्धा जिल्ह्यातील ५३ उद्योग समूहांशी ३,०११ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. यामध्ये इवोनिथ समूहाची १,७२५ कोटी रुपयांची गुंतवणूक सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ एसएमडब्ल्यू इस्पात प्रा. लि. ५०० कोटी, श्रीनिवास स्पीनटेक्स १५० कोटी, आश्वी पॉलिपॅक ७५ कोटी आणि विश्वत्रिवेणी टेक्सटाइल्स ५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा समावेश आहे.
या करारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातील, असे उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. केवळ करार न करता त्यातून प्रत्यक्ष उद्योग आणि रोजगार उभे राहणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
वर्ध्यातील उद्योगांनी स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देतानाच पर्यावरणपूरक उपक्रमांवरही भर दिला आहे. प्लास्टिकऐवजी काचेच्या बाटल्यांचा वापर करून उत्पादनांचे पॅकेजिंग करण्याचा स्थानिक प्रयोग कौतुकास्पद असल्याचे सामंत यांनी सांगितले. वर्ध्याचा हा उपक्रम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही राबविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्योजकांनी सीएसआर निधीचा समाजोपयोगी कामांसाठी अधिकाधिक वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. शाळांमधील सुविधा, प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विकास यांसारख्या कामांसाठी हा निधी वापरता येईल, असे त्यांनी सांगितले.
वर्ध्यातील हळदीची गुणवत्ता लक्षात घेऊन जिल्ह्यात हळद संशोधन केंद्र किंवा त्याचे उपकेंद्र सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. याबाबत हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.
मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील उद्योजकांना एक कोटी रुपयांपर्यंत, तर सर्व्हिस क्षेत्रातील व्यवसायांना ५० लाख रुपयांपर्यंत मदत उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर असल्याचेही त्यांनी सांगितले. वर्ध्यातील तरुणांनी मर्यादित भांडवलातून फायर डोअर निर्मिती सुरू केल्याचा उल्लेख करत सामंत यांनी स्थानिक तरुणांच्या उद्योजकतेचे कौतुक केले.