
फोटो सौजन्य - Social Media
बुलढाणा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या हालचालींना अचानक ब्रेक लागल्याने इच्छुकांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. निवडणुकांचे संकेत मिळताच जिल्हाभरात राजकीय हालचालींना वेग आला होता. इच्छुकांनी मतदारसंघात दौरे, बैठका, गाठीभेटी आणि शक्तिप्रदर्शन यांद्वारे वातावरण तापवले होते. मात्र निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्याने ही सर्व धडपड थंडावली असून इच्छुकांनी तात्पुरती विश्रांती घेतल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ग्रामीण भागाच्या विकासासाठी महत्त्वाच्या संस्था गेल्या आठ वर्षांपासून लोकप्रतिनिधींविना आहेत. त्यामुळे अनेक विकासकामे रखडली असून सध्या प्रशासनच कारभार चालवत आहे. या परिस्थितीत सामान्य कार्यकर्त्यांनाही मोठा फटका बसत आहे. पक्षासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या उमेदवारीसाठी मात्र पक्षांतर्गत स्पर्धा आणि राजकीय समीकरणांशी सामना करावा लागत आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी सामाजिक, धार्मिक आणि क्रीडा कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. अनेकांनी देणग्यांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर न झाल्याने या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे. आर्थिक आणि शारीरिक गुंतवणूक करूनही अनिश्चिततेमुळे इच्छुकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अद्याप निकाली न लागल्याने निवडणुकीची दिशा अधिकच अस्पष्ट झाली आहे. कोणत्या मतदारसंघात कोणते आरक्षण लागू होणार, याबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांचे गणित बिघडले आहे. त्यामुळे इच्छुकांनी सध्या राजकीय हालचाली कमी करत आपापल्या कामांकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजप, काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट यांच्यात तीव्र स्पर्धा अपेक्षित आहे. मात्र निवडणुकीची तारीख जाहीर होईपर्यंत इच्छुकांना प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे ‘निवडणुकीचा मुहूर्त कधी?’ हा प्रश्न आता सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला आहे.