अदिती सारंगधरची नवी भूमिका
अदिती सारंगधर हे नाव गेली २० वर्ष घराघरामध्ये माहीत झालं आहे. ‘वादळवाट’ पासून सुरू झालेला झी वरील हा प्रवास आता एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचला आहे. अदितीची नवी मालिका आजपासून सुरू होत आहे आणि प्रेक्षकांना या मालिकेबाबत खूपच उत्सुकता आहे. कारण यामध्ये अदिती चक्क आईच्या भूमिकेत दिसणार आहे आणि अनेकदा श्रीमंत – गरीब कुटुंब आणि श्रीमंत घरातील आई ही नकारात्मक भूमिकेत दाखवली जाते असा समज आहे. मात्र हाच एकाच पठडीतील समज तोडण्यासाठी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं अदितीने अगदी आवर्जून सांगितले आहे.
नवराष्ट्रसह अदितीने खास बातचीत करत आपल्या या नव्या मालिकेबाबत आणि तिच्या भूमिकेबद्दल खुलासा केला आहे. अदितीने अगदी मनापासून आपण आता वेगळ्या भूमिकेत असल्याचे आणि तितकीच भक्कम भूमिका असून झी वर माहेरपणाला आल्याचे सांगितले. अदिती ‘सनई चौघडे’ या मालिकेत तेजस्विनी खानोलकर ही अत्यंत भक्कम भूमिका साकारत आहे आणि याविषयी तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या.
“सनई चौघडे” मध्ये राज हंचनाळेची दमदार एन्ट्री; ‘जय खानोलकर’च्या भूमिकेत घालणार धुमाकूळ
पुन्हा एकदा झी मराठीसह सनई चौघडेत काम करताना कसं वाटतंय असं विचारल्यावर अदिती म्हणाली की, ‘अत्यंत मस्त वाटतंय. सासर कितीही छान असलं तरीही माहेरी आल्यानंतर आईच्या हातचा वरण भात खाऊन जी एनर्जी मिळते ना तीच भावना सध्या आहे. माझंही असंच आहे. गेल्या कित्येक वर्षाची साथ आहे आणि इथे परत येऊन काम करताना अगदी माहेरपण असल्यासारखंच वाटतं आणि मनमोकळेपणाने काम करता येतं’ अदितीने उत्साहाने आपल्या मालिकेविषयी आणि झी बरोबर पुन्हा काम करत असल्याबाबत सांगितलं.
नायिकेपासून सुरू झालेला प्रवास आता आई आणि सासू अशा भूमिकेपर्यंत येऊन पोहचला आहे तर तुझ्या भावना काय आहेत? असं विचारल्यावर अदितीने अत्यंत समंजसपणाने सांगितलं की, ‘खरंतर आयुष्यात बदल हा हवाच. २१ व्या वर्षात दिसणारी मी आणि आता चाळिशीत दिसणारी मी यात फरक आहेच. हळूहळू चेहऱ्यावर वय दिसतं आणि ते प्रत्येकाने स्वीकारायला हवं आणि माझ्याबाबत म्हणशील तर मी ते Gracefully स्वीकारत आहे. अगदी वयाच्या ४० पर्यंत लीड भूमिका साकारायला मिळणं हे काही सोपं नाही आणि प्रत्येक गोष्टीत एक फ्लेवर असतो आणि तो असल्याशिवाय काही मजा नाही’
अदितीने नेहमीच वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान या मालिकेत ती ३ मुलांच्या आईची भूमिका साकारत आहे. ही भूमिका का निवडावी वाटली असं विचारल्यावर अदिती म्हणाली की, ‘या मालिकेत खरं तर दोन कुटुंबातील आईची ही कथा आहे आणि आई ही अत्यंत महत्त्वाची भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. हळूहळू आता माझी भूमिका प्रेक्षकांसमोर येत आहे. तेजस्विनी खानोलकर ही अत्यंत तेजस्वी अशी बिझनेसवुमन असून ३ मुलांना तिने एकटीने वाढवलं आहे आणि त्यामुळे ती अत्यंत कणखर आहे. स्वतःचं डाएट फॉलो करण्यापासून ते बिझनेस हे स्वतःचं बाळ समजून ते संपूर्णपणे एकटीने वाढविण्यापर्यंत काम तिने केलं आहे आणि म्हणूनच आपल्या मोठ्या मुलाच्या जयच्या हातात हा उद्योग देताना ती त्याबाबत अत्यंत काटेकोर आहे आणि Possessive आहे. तेजस्विनीच्या या भूमिकेला खूपच कंगोरे आहेत त्यामुळे ही भूमिका निवडावी वाटली.’
यानंतर पुढे अदिती म्हणाली की, ‘या मालिकेत दोन कुटुंब आहेत आणि बरेचदा गरीब कुटुंबातील दुःख ही पटकन दिसतात पण अतिश्रीमंत कुटुंबातील दुःख ही पटकन दिसत नाहीत आणि या दोन्ही कुटुंबाच्या पद्धतीमधील थेट आरसा या मालिकेतून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आणि मालिका जशी पुढे जाईल त्यानुसार, याबाबत अधिकाधिक कंगोरे प्रेक्षकांच्या समोर येतील.’
Exclusive: ‘मायबाप प्रेक्षकांचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, साथ लाभावी हीच इच्छा’, – मेघना एरंडे
विविध भूमिका निवडताना काय विचार करतेस असं विचारल्यावर अदिती पटकन म्हणाली की, ‘टेलिव्हिजन माध्यम गेल्या काही वर्षात बदललं आहे आणि माणसांबरोबर काम करून समाधान वाटायला पाहिजे तसंच तुम्ही कोणाबरोबर काम करत आहात ती टीम आणि त्यावर असणारा विश्वास महत्त्वाचा आहे. या दोन गोष्टी पाहून मी काम निवडते आणि झी बरोबर काम करताना तर डोळे झाकून मी काम करते. कारण कल्पनामाध्यम वेगळं आहे आणि त्यासाठी कलाकारांनी स्वतःला मेंटेन करावं लागतं. हा विचार करूनच काम स्वीकारते’
Gen Z सह काम करताना काय अनुभव आहे विचारल्यावर अदितीने अगदी वेगळंच उत्तर दिलं, ‘खरं सांगायचं ना तर मला Gen Z ची भीती वाटते. त्यांची स्वतःची अशी रोखठोक मतं आहेत आणि त्यांच्याकडे उत्तरंही तयार असतात. या पिढीवर खरंतर सोशल मीडियाने वेगळेच संस्कार केले आहेत. त्यांच्या वेगाने धावताना आपली दमछाक होते असं वाटतं. त्यांच्याकडून शिकण्यासारखेही खूप आहे कारण त्यांचा प्रत्येक गोष्टीचा एक अभ्यास असतो. पण असं असलं तरीही आमच्या पिढीच्या भावना मात्र एकदम खऱ्या होत्या आणि आमची पिढी ही प्रयोग करणारी होती. अनुभवातून शिकणारी होती.’
प्रेक्षकांनी ही मालिका का पहावी असं विचारल्यावर अदितीने सांगितले की, आपल्याच घरातील वाटणारी अशी ही कथा आहे आणि दोन कुटुंब हे आपल्याच घरातील माणसं असल्यासारखे प्रेक्षकांना वाटेल. त्यांना आपल्याच घरातील गोष्टी घडत आहेत असं वाटेल हे नक्की, आतापर्यंत प्रेक्षकांंनी भरपूर प्रेम दिलं आहे आणि या मालिकेच्या माध्यमातूनही मिळावं अशीच अपेक्षा आहे. या मालिकेलाही प्रेक्षक भरभरून प्रेम देतील असा विश्वासही अदितीने यावेळी व्यक्त केला.






