
बाईपण जिंदाबादमध्ये अनुराधाची कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला
काही वेळा थेट संबंध नसला तरी तिच्यावर आरोपांच्या फैरी झाडणे, व्यवस्थेचा बळी ठरवणे हे घडत राहते. तिला मुळापासून उपटून टाकण्याचे, तिचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न होतच राहतात. पुरुषप्रधान संस्कृतीत बाईने थोडं स्वतंत्र जगण्याचा प्रयत्न केला की ती ‘चुकीची’ ठरते. तिच्या उंच भरारीला स्वप्नांचे पंख असले तरी ते कापण्याचा प्रयत्न केला जातो. तरीही ती उठते… तुटलेल्या स्वप्नांच्या धुळीतून उभी राहते. मात्र त्यासाठी तिला चुकवावी लागणारी किंमत खूप मोठी असते… याला उत्तर आहे का? हाच शोध कलर्स मराठीच्या बाईपण जिंदाबाद मधील ‘अनुराधा’ या कथेत घेतला आहे.
Colors Marathi Serial: ‘बाईपण जिंदाबाद!’चा नवा टप्पा, ‘शर्ट’मध्ये दिसणार बदलत्या स्त्रीविश्वाची कथा
आजच्या स्त्रीची ही गोष्ट इतर स्त्रीप्रधान कथांपेक्षा वेगळी
अनुराधा साधी, सरळ, आत्मविश्वासू स्त्री. पण एका खोट्या आरोपाने तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. दोन वर्षांनी ती जेलमधून बाहेर पडली तरी समाजाने तिला ‘जन्मठेप’ सुनावलेली असते—भिंती बदलतात, पण चौकट तशीच राहते. नाती तुटतात, ओळख हरवते, आणि पायाखालची जमीन हलते.
अशावेळी अनुराधा जे काही करते ते मुळापासून अनुभवण्यासारखे आहे. प्रत्येक अपमान, शंका, कुजबुज ओलांडत ती काय करते, ज्याने समाजाच्या व तुरुंगाच्या बेड्या कशा तुटतात—याची ही जगावेगळी गोष्ट. ही केवळ तुरुंगातून सुटण्याची नाही—तर त्या क्षणाची गोष्ट आहे, जिथे स्त्रीचे अस्तित्व पणाला लागते. तो क्षण प्रत्येक स्त्रीने जाणून घ्यावा,समजून घेऊन,समृद्ध व्हावा असा आहे, हा प्रवास अनुभवण्यासाठी अनुराधा येतेय आपल्या भेटीला.
वेदनेचा सूर
अनुराधाच्या कथेतला वेदनेचा सूर खोल आहे. जेलमधून परत आलेली एक स्त्री आणि त्यातून उलगडत जाणारे स्त्रीत्वाचे प्रश्न बाईपणाचं वेगळं रूप समोर आणतात. हे प्रश्न खरं तर प्रत्येक स्त्रीने विचारण्यासारखे, आपल्या जगण्यात असले आहेत तरी अनुराधासारखे चॅलेंजिंग क्षण न आल्याने ते दिसत नाहीत.विचारले जात नाहीत., अशा न बोलेल्या, न दिसणाऱ्या पण खोलवर असलेल्या प्रश्नांमधून ही कथा आकार घेते. कोर्टाने दिली ३ वर्षांची शिक्षा, पण समाजाने सुनावली ‘जन्मठेप’. अनुराधा असं का म्हणते हे अनुभवण्यासाठी ही कहाणी प्रत्येकाने पाहावी असेच म्हणावे लागेल. बाईपण जिंदाबाद! अनुराधा प्रेक्षक २३ नोव्हेंबर, रात्री ८ वा कलर्स मराठीवर पाहू शकणार आहेत आणि महिलेच्या विविध त्रासाच, पैलूंचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.