(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे त्यांच्या भावनिक मालिकेद्वारे – ‘बाईपण जिंदाबाद’.प्रत्येक स्त्रीचं आयुष्य हे त्याग, समर्पण आणि जबाबदाऱ्यांनी विणलेली कहाणी असते. लग्नाआधी वडिलांचं घर सांभाळणारी मुलगी, लग्नानंतर नवऱ्याचं घर आणि संसार आपल्या खांद्यावर वाहते. तिचं स्वतःचं आयुष्य, तिचे स्वप्न, तिच्या इच्छा या सगळ्या ती कुठेतरी मागे ठेवते. नात्यांच्या बंधनात अडकलेली, पण त्याच नात्यांना जिवापाड जपणारी ही स्त्री म्हणजे ‘आई’. अशीच एक स्त्री, अशीच एक आई, आता स्वतःचं आयुष्य नव्यानं जगण्याचा निर्णय घेते. बाईपण जिंदाबाद या मालिकेच्या शृखंलेत येणारी तिसरी कथा आहे ‘आई रिटायर होतेय’. ही संवेदनशील आणि विचार करायला लावणारी कथा आहे.
या कथेत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक सासू सत्यभामाच्या भूमिकेत दिसतील, शुभांगी गोखले अनघाची म्हणजेच आईची भूमिका साकारणार आहे. तर केतकी पालव म्हणजेच सून ऋचा, आणि स्मिता शेवाळे म्हणजे मुलगी समीराच्या भूमिकेत झळकणार आहे. या कथेतून आईच्या भूमिकेत असलेली अनघा एक नवा विचार मांडते आईलाही निवृत्ती हवीच ना? आता बघूया ह्या कथेत अनघा आपले विचार, निर्णय कसं सांगते? तिला कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं…
पहिल्यांदाच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ दिसणार एकत्र, अशोक मा.मा. मालिकेत नवे वळण
अनघा म्हणजेच ‘आई’ शाळेतून निवृत्त होणार आहे. तिची मुलगी, सून आणि सासू सगळ्यांच्या मनात एकच अपेक्षा आहे, की आता आई घराची संपूर्ण जबाबदारी उचलणार. आईला काय हवं आहे ? तिची काय इच्छा आहे ? याचा विचार न करता सगळ्यांनी अगदी सोयीस्करित्या हे ठरवले आहे. हे असंच बऱ्याच घरातील वास्तव असतं. आई म्हणजे ‘बॅकअप’ अशी सर्वांची सवयच झाली आहे. पण यावेळी या सगळ्या पल्याड जाऊन आई वेगळा निर्णय घेते. शाळेतून निवृत्त झाल्यांनतर स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईपणातून देखील निवृत्ती घ्यायची असं ठरवते. सर्वांच्या अपेक्षांना छेद देत स्वतःचं आयुष्य स्वतःच्या मर्जीनं जगायचं ठरवते. आईचा हा निर्णय ऐकून घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. पण नक्की आईच्या मनात काय आहे ? तिचं कोणतं स्वप्न आहे जे तिला पूर्ण करण्याचे आहे ? त्यामध्ये तिला घरच्यांची साथ मिळेल ? हे जाणून घेणे उत्सुकतेचे असणार आहे.






