(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त एकाच नावाची चर्चा आहे: ‘धुरंधर २’. रणवीर सिंगच्या या चित्रपटाने केवळ कमाईचे सर्व विक्रम मोडले नाहीत, तर चित्रपटसृष्टीतील दिग्गजांचीही मने जिंकली आहेत. आता ‘गदर’ फेम अभिनेत्री अमिशा पटेलनेही या चित्रपटाची प्रशंसा करून बॉलीवूडमधील इंडस्ट्रीवर टीका केली आहे.
अमिशा पटेलने तिच्या ‘X’ अकाउंट या सोशल मीडिया हँडलवर या चित्रपटाला “डोळे उघडणारा” म्हटले आहे. तिने दिग्दर्शक आदित्य धरवर कौतुकाचा वर्षाव करत म्हटले की, चित्रपटसृष्टीने “प्रोजेक्ट्स” बनवणे थांबवून “चित्रपट” बनवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
अमिषाने तिच्या ट्वीटमध्ये काय लिहिले जाणून घेऊ
बॉलीवूडमधील सध्याच्या ट्रेंडवर निशाणा साधत अमिषाने लिहिले, “इंडस्ट्री धुरंधरचे कौतुक करत आहे हे पाहून खूप छान वाटते. निर्मात्यांनी हे समजून घेतले पाहिजे की आदित्यने एक चित्रपट बनवला आहे, केवळ एक प्रोजेक्ट नाही. त्याने खऱ्या कलाकारांना कास्ट केले आहे, केवळ पार्ट्यांमध्ये ट्रेंड करणाऱ्या इन्फ्लुएन्सरर्सला नाही. प्रोजेक्ट्स बनवणे थांबवा आणि चित्रपट बनवायला सुरुवात करा.” असे लिहून अभिनेत्रीने इंडस्ट्रीवर निशाणा साधला आहे.
रजनीकांतपासून ते एस.एस. राजामौलीपर्यंत… प्रत्येकजण प्रभावित
‘धुरंधर २’ ची जादू केवळ बॉलीवूडमध्येच नाही, तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही उमटत आहे. बॉलीवूड स्टार्स आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, आयुष्मान खुराना आणि रितेश देशमुख यांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे, तर दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत, ज्युनियर एनटीआर, अल्लू अर्जुन आणि महेश बाबू हे देखील रणवीर सिंगच्या अभिनयाचे चाहते बनले आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक एस.एस. राजामौली आणि नागार्जुन यांनीही या फ्रँचायझीला सिनेमासाठी एक मोठी उपलब्धी म्हटले आहे.
Eye opener 👌Industry Praising DHURANDHAR is wow and the brand deserves all the accolades 👏👏industry needs to realise that ADITYA made a film and not a project,,casted actors and not instagrammars who trend at parties 👍stop making projects and and start making films👍 — ameesha patel (@ameesha_patel) March 24, 2026
बॉक्स ऑफिसवर ८०० कोटींचा टप्पा पार
‘धुरंधर २’ ने कमाईच्या बाबतीत धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच सोमवारी, चित्रपटाने भारतात अंदाजे ६५ कोटी रुपयांची कमाई केली. यासह, चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५०० कोटी रुपयांचा जादुई टप्पा ओलांडला आहे. ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाची जगभरातील कमाई ८४४.७६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ज्या वेगाने चित्रपट पुढे जात आहे, ते पाहता निर्मात्यांना आशा आहे की तो लवकरच १००० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल.
काय आहे ‘धुरंधर २’ ची कथा?
हा चित्रपट जसकिरत सिंग रंगीपासून ‘हमजा अली मजारी’ बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवतो. रणवीर सिंग एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे, जो देशावरील दहशतवादी हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानात घुसखोरी करतो आणि लवकरच ‘शेर-ए-बलुच’ म्हणजेच लयारीचा बिनमुकुट राजा बनतो. चित्रपटातील उत्कंठा आणि ॲक्शन प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे.






