(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर, ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेता कुशल बद्रिके याने नऊ रंगांविषयी विचार करायला लावणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. शारदीय नवरात्रोत्सवाला नुकतीच सुरूवात झाली असून सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार या नऊ रंगांच्या विविध लूकमधील फोटो, व्हिडिओ शेअर करताना दिसतात.
चला हवा येऊ द्या या शोमुळे घराघरात पोहोचलेला कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळतं, तो नेहमी आपल्या चाहत्यांसाठी अनेक पोस्ट शेअर करत असतो त्याने नुकताच पोस्ट केलेल्या या व्हिडिओने अनेकांना नवरात्रीच्या नऊ रंगांविषयी नव्या दृष्टिकोनातून पाहायला लावले आहे. या व्हिडिओला चाहते आणि अनुयायांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून, अनेकांनी आपल्या अनुभव आणि भावना कमेंट्समध्ये शेअर केल्या आहेत.
‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’मधील एका दृश्यामुळे रणबीरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; नेमकं प्रकरण काय?
व्हिडीओमध्ये कुशल म्हणतोय की, ‘नऊ रंग आणि नवरात्री यांचा विचार करत असताना मला अचानक ज्या गोष्टींचा साक्षात्कार झाला ना, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. रंग बदलणारी माणसं या जगात आहेत, पण त्या रंगांचा उपयोग नवरात्रीत होत नाही. तसंच रंग बदलणारा सरडासुद्धा असतो, पण त्यालाही नवरात्र साजरी करता येत नाही.’
90 च्या दशकातलं बॉबी देओलचं ‘हे’ गाणं तब्बल २८ वर्षांनंतर अजूनही होतय हीट
‘होळीत आपण आपल्या अंगाला वेगवेगळे रंग लावतो, तर नवरात्रीत आपण कपड्यांच्या वेगवेगळ्या रंगांना आपलं अंग लावतो. ‘रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा’ या सुरेश भटांच्या गाण्यात ज्या रंगाविषयी बोललं जातंय, तो रंग दाखवण्याचा नसून वैयक्तिक अनुभवण्याचा आहे. त्यामुळे नवरात्रीत त्या रंगांचा उपयोग होत नाही आणि कदाचित म्हणूनच हे गाणं गरब्यात वाजत नाही. युपीत सुरू झालेली कृष्णाची रासलीला गुजरातमध्ये मानल्या जाणाऱ्या संतोषी मातेपुढे खेळली जाते आणि महाराष्ट्रात हा उत्सव जोरदार साजरा केला जातो, त्यामुळे या उत्सवाला जाती-पातीचा रंग चढत नाही आणि माणूस म्हणून जगण्याची रंगत येते, हे या सणाचं मला वैशिष्ट्य वाटतं’ असं कुशलने पुढे म्हटलं आहे.