
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बालभारतीच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त एक अत्यंत भावस्पर्शी आणि आठवणींना उजाळा देणारं खास गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘बालभारती गीत’ या नावाचं हे गीत अनेक पिढ्यांच्या बालपणाशी घट्ट नातं सांगणारं ठरत असून, बालभारतीच्या पुस्तकांशी जोडलेल्या आठवणी, भावना आणि संस्कार यांचा सुरेख मिलाफ या गीतातून अनुभवायला मिळणार आहे.
या गीताला लोकप्रिय गायिका वैशाली सामंत यांचा सोज्वळ आणि भावपूर्ण आवाज लाभला आहे. गीताचं संगीत प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी दिलं असून, शब्दरचना दासू वैद्य यांची आहे. या संपूर्ण प्रकल्पाला बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांचे मार्गदर्शन लाभले असून, गीताची संकल्पना किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांची आहे.
‘बालभारती’ हे नाव उच्चारताच मनात दरवळणारा पुस्तकांचा खास सुगंध, मुखपृष्ठांवरील बोलकी आणि रंगीबेरंगी चित्रं, कवितांच्या ओळींमधून मिळालेली भाषेची पहिली ओळख आणि आयुष्याला दिशा देणारे संस्कार या सगळ्याच भावना या गीतातून अत्यंत प्रभावीपणे उलगड होणार आहेत. हे गीत पाहताना आणि ऐकताना रसिक नकळत आपल्या शाळेच्या दिवसांत, बालपणाच्या निरागस आठवणींत हरवून जाणार आहेत.
हे ‘बालभारती गीत’ एकविरा म्युझिकवर प्रदर्शित झालं असून, त्याचं सादरीकरण एकविरा म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळत आहे. गीताचं दृश्यरूपही तितकंच सुंदर, हळवं आणि भावनिक असून, प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं ठरत आहे. या गीताबद्दल बोलताना बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक म्हणाल्या, “बालभारती ही केवळ पुस्तकांची मालिका नाही, तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला पहिला संस्कारक्षम स्पर्श आहे. या गीतातून त्या आठवणी, आणि बालपणाची निरागस भावना जशीच्या तशी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. प्रत्येक प्रेक्षकाला हे गीत पाहताना स्वतःचं बालपण पुन्हा एकदा अनुभवता यावं, हीच आमची इच्छा आहे.”
तर संगीतकार अवधूत गुप्ते आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, “बालभारती माझ्याही बालपणाचा अविभाज्य भाग आहे. या गीताचं संगीत करताना केवळ सूर जुळवण्यापेक्षा आठवणी, भावना आणि संस्कार जपण्यावर अधिक भर दिला. प्रत्येक पिढीला आपल्या बालपणाशी पुन्हा एकदा जोडणारा हा एक वेगळाच अनुभव आहे. हे गाणं ऐकताना आणि पाहताना बालभारतीच्या पुस्तकांचा तो खास सुगंध नक्कीच जाणवेल.” बालभारतीच्या पुस्तकांनी दिलेल्या संस्कारांचा, कल्पनाशक्तीचा आणि ज्ञानप्रवासाचा हा संगीतमय उत्सव निश्चितच प्रेक्षकांच्या मनात घर करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.