(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नेहमीच तरुणाईने इतिहास घडवला असल्याची साक्ष इतिहास देताना दिसला आहे. कोणत्याही पिढीतील तरुणाईमध्ये समाजातील कोणत्याही क्षेत्रात क्रांती घडविण्याची धमक असते. यासाठी केवळ तरुणाईने एकजूट होण्याची गरज असते. समाजात बदल घडविण्याची अद्भुत शक्ती असलेल्या तरुणाईच्या संघर्षाची कथा ‘निर्धार’ या आगामी मराठी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘वंदे मातरम…’ या सुमधूर गीतानंतर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. २८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी जयलक्ष्मी क्रिएशनच्या बॅनरखाली ‘निर्धार’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिनानाथ वालावलकर यांनी लिहिलेल्या कथेवर चित्रपट बनविण्याची जबाबदारी दिग्दर्शक दिलीप भोपळे यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे. ‘निर्धार’ची कथा संघर्षाची असल्याचे सांगत चित्रपटाचा ट्रेलर सुरू होतो. हातात मशाली घेऊन धावणारे लोक आणि पेटलेली वस्ती ट्रेलरमध्ये सुरुवातीला दिसत आहे. या चित्रपटातील लढा भ्रष्टाचाराविरोधी असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. एकजुटीच्या क्रांतीची मशाल पेटलेली या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
आगीत भस्मसात होणाऱ्या वस्तीतून ‘अरे कुणीतरी वाचवा रे…’, अशी आर्त किंकाळी ऐकू येते आणि थेट हृदयाला भिडते. त्यानंतर ‘वंदे मातरम…’ गाण्याची झलक पाहायला मिळते. खरोखर भ्रष्टाचारावर काही उपाय आहेत का, त्याचं उत्तर सर्वसाधारण नाहीच असे असणार. मग तो नष्ट कसा होईल? काय उपाय आहे? लेखकांनी याचे उत्तर या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर उत्तरोत्तर उत्कंठा वाढविण्याचे काम करणारा आहे. संघर्षाची ही कथा प्रेरणेचे वादळ घेऊन २८ नोव्हेंबरला येत असल्याचे ट्रेलरच्या शेवटी सांगण्यात आले आहे.
हार्दिक पांड्याने गुपचूप उरकला साखरपुडा? कथित गर्लफ्रेंड महिका शर्मासोबतच्या पोस्टने वेधले लक्ष
‘निर्धार’च्या ट्रेलरबाबत दिग्दर्शक दिलीप भोपळे यांनी सांगितले की, हा चित्रपट केवळ मनोरंजन करणारा नसून, समाजाला विचारांची खूप मोठी शिदोरी देणारा आहे. चित्रपट हे रसिकांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम असल्याने तरुणाईची कथा तरुणाईच्याच माध्यमातून पोहोचवण्याचे काम ‘निर्धार’ करणार असल्याचे दिग्दर्शक दिलीप भोपळे म्हणाले आहे. या चित्रपटात समाजातील आणि राजकीय पटलावरील विविध मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले आहे. तरुणाईची मानसिकता, विचारसरणी आणि दृष्टिकोन या चित्रपटाद्वारे समाजासमोर येणार आहे. समाजात वावरताना आणि समाजासाठी कार्य करताना आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून ‘निर्धार’ची निर्मिती केल्याची भावना निर्मात्या पद्मजा वालावलकर यांनी व्यक्त केली.
‘निर्धार’मध्ये डॉ. गिरीश ओक, सौरभ गोगटे, पल्लवी पटवर्धन, प्रज्ञा केळकर, मिलिंद ऊके, उमेश बोळके, अभिनव कुरणे, जान्हवी सावंत, ऋतुजा कनोजिया, अभय पाटील, श्रेयस मोहिते, दिनानाथ वालावलकर, युवराज झुगर, केतकी पाटील, पल्लवी प्रसाद, आनंद पाटील, सुरेंद्र केतकर, विद्या डांगे, एन. डी. चौगुले, कोमल रणदिवे आदी कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. वितरणाद्वारे महाराष्ट्रभरातील तमाम रसिकांपर्यंत ‘निर्धार’ पोहोचवण्याची जबाबदारी पिकल एंटरटेनमेंट करणार आहे. डिओपी अतुल सुपारे यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, विकी बिडकर यांनी कला दिग्दर्शन केले आहे.






