‘आई कुठे काय करते’ (aai kuthe kay karte) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या मालिकेतील अरुंधतीच्या (Arundhati) समजूतदारपणावर जेवढं प्रेक्षक प्रेम करतात तेवढाच तिरस्कार अनिरुध्दच्या आततायी स्वभावाचा करतात. अनिरुध्दच्या (Anirudhdh) स्वभावाचे अनेक पैलू अभिनेता मिलिंद गवळी यांनी मोठ्या खुबीने स्मॉल स्क्रीनवर साकारले आणि अलिकडेच या मालिकेला 600 भाग पूर्ण झाल्यामुळे मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर अनिरुध्दमुळे आलेले चांगले-वाईट अनुभव एक पोस्ट शेअर करून कथन केले आहेत.
पोस्टमध्ये आपल्या भावना व्यक्त करताना अभिनेता मिलिंद गवळी यांनी लिहलं की, “६०० भाग पूर्ण झाले…”आई कुठे काय करते” या मालिकेतल्या संपूर्ण teamचं खूप खूप अभिनंदन. तुम्हा मायबाप प्रेक्षकांचे अगदी मनापासून खूप खूप आभार. प्रेक्षकांनी ही मालिका अगदी सुरुवातीपासूनच डोक्यावर घेतली, पहिल्या एपिसोडपासूनच अरुंधती देशमुख ही मनाला भावली, प्रेक्षकांच्या मनात तिने घर केलं, आणि अगदी 600 एपिसोड नंतर सुद्धा मनात रुजली, बहरली, फुलली. पहिल्याच एपिसोडमध्ये अनिरुद्ध देशमुख ती उशिरा घरी येते म्हणून तिला घराच्या बाहेर काढतो,
तो प्रसंग पाहून प्रेक्षकांबरोबर माझं स्वतः ही मन हळहळलं,मला स्वतःला अनिरुद्ध देशमुख कसा आहे तो तेव्हाच कळला. पहिल्या एपिसोड पासून ते आता 600 एपिसोडपर्यंत ह्या अनिरुद्ध देशमुख वर अक्षरश: शिव्यांचा वर्षाव झाला, झाला काय होतोच आहे”, असं मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं.
“जितके लोक अरुंधती वर प्रेम करतात तितकाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त अनिरुद्ध देशमुखचा तिरस्कार करतात.मला काय त्याचा फार आनंद होतो अशातला भाग नाहीये, वाईट वाटतं, कोणाला शिव्या खाणं आवडतं,अरुंधती बरोबर वादावादीचे भांडणाचे सीन झाल्यावर खरंच मनाला दुःख होतं, पण Somebody has to do this dirty job of playing this bloody Anirudh Deshmukh who is useless worthless talks nonsense. परत पण या ६०० एपिसोड्समध्ये अनिरुद्ध देशमुखची खूप चांगली बाजू सुध्दा प्रेक्षकांच्या समोर आली.
मुलांवरचं प्रेम, त्यांच्या भविष्याची काळजी, घर चालवण्यासाठी कष्ट करणे, आई-वडिलांवरचं प्रेम , चूक कबूल करणं, कुटुंबाला महत्व देणं,खूप अशा त्याच्या चांगल्या गोष्टी सुद्धा समोर आल्या. आई कुठे काय करतेची पटकथा नमिता वर्तक लिहिते, ती जेव्हा मला म्हणाली कि, मला तुझ्यामध्ये अनिरुद्ध दिसतो. नंतर मी आत्मपरिक्षण करायला सुरुवात केली,आणि खरंच आश्चर्याची गोष्ट म्हणजे, माझ्यात अनिरुद्ध देशमुख कुठून कुठून भरलाय, तो मलाच कधी दिसला नव्हता, आत कुठेतरी दडून बसला होता.
हळूहळू डोकं बाहेर काढायला लागला. नमिताचे खूप आभारी, मला अनिरुद्ध दिल्या बद्दल आणि माझ्यातला अनिरुद्ध दाखवल्याबद्दल. कारण मला माहिती आहे जितका माझ्यातला अनिरुद्ध राक्षस आतून बाहेर येईल तितकाच तो मला एक चांगला माणूस बनवत जाईल. कदाचित म्हणून प्राणसाहेब, अमरीशपुरी, अमजद खान, राजशेखर , निळूभाऊ फुले ही माणसं अतिशय चांगली होती, प्रेमळ होती, सज्जन होती.त्यांच्यात आतला राक्षस पडद्यावर बाहेर आला आणि मनाने ते निर्मळ आणि स्वच्छ झाले. Anirudh Deshmukh हा Negative role जरी मी करत असलो, तरी सुद्धा माझ्यातली Positivity कधी ही कमी होणार नाही..६००च्या पुढे.”