
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ या नाटकाचा ६०० वा प्रयोग मोठ्या उत्साहात पार पडला.अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या विशेष प्रयोगाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि आनंदाचे वातावरण होते.या प्रयोगात एक खास सरप्राईज देण्यात आले, ज्यामुळे हा क्षण अधिक भावनिक आणि संस्मरणीय ठरला. प्रेक्षकांसोबतच कलाकारांनीही या यशाचा आनंद साजरा केला.
अभिनेता संदीप पाठक ला त्याच्या बालवाडीपासूनच्या जिवलग मित्रांनी दिलेलं खास सरप्राईज हा या सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरला. मिलिंद कुलकर्णी, निलेश चांडक, डॉ. सुशील मुगडिया, सुशील जेठलिया, अॅड. वर्षा मुंदडा, डॉ. प्रसाद देशमुख आणि संजय सावंत या संदीपच्या सर्व मित्रांनी एकत्र येत विमानाचं भव्य कटआऊट तयार केलं होतं. नाट्यगृहात प्रवेश करतानाच जणू विमानात चढत आहोत, असा अनोखा अनुभव देणारी आकर्षक सजावट करण्यात आली होती. रेड कार्पेटसह केलेल्या या खास मांडणीमुळे वातावरण अधिकच उत्साही बनले. रांगोळी, सनई-चौघडे आणि प्रेक्षकांना अत्तर लावून स्वागत अशा पारंपरिक पद्धतीने संपूर्ण वातावरण उत्सवमय झालं होतं. यावेळी केक कटिंगसोबतच शाल-श्रीफळ देऊन अभिनेता संदीप पाठक तसेच नाट्यनिर्माते संदीप सोनार आणि समीर हंपी या निर्मात्यांचा सन्मान करण्यात आला.
या अनपेक्षित सन्मानाने भारावलेल्या संदीप पाठकने भावना व्यक्त करत सांगितलं, ‘आयुष्यात मी खरंच काही कमावलं असेल, तर ती माणसं आहेत. मित्र-मैत्रिणी, कुटुंब आणि सहकाऱ्यांच्या साथीनं हा प्रवास शक्य झाला. आजच्या धावत्या जगात असं मनापासूनचं सरप्राईज मिळणं म्हणजे आयुष्यभर जपण्यासारखी आठवण आहे’ प्रकाशझोतात दिसणाऱ्या प्रत्येक यशामागे अनेक अनामिक हातांचा वाटा असतो, याची जाणीव करून देणारा हा सोहळा ‘वऱ्हाड निघालं लंडनला’च्या यशात आणखी एक सुवर्णक्षण ठरला.
ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी गाजवलेलं ‘वऱ्हाड निघालं लंडनला’ हे एकपात्री नाटक अनेक वर्षांपासून मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. हे नाटक अभिनेता संदीप पाठक ने नव्या पिढीपर्यंत पोहोचवत महाराष्ट्रभर यशस्वी प्रयोगांद्वारे सादर केलं आहे. अस्सल मराठवाडी बोली, ५२ विविध व्यक्तिरेखांचा बहारदार आविष्कार, वेगवेगळ्या आवाजांची रंगत आणि प्रचंड ऊर्जा यामुळेहे नाटक आजही तितकंच लोकप्रिय आणि ताजं वाटतं.प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद आणि नाटकाची सातत्यपूर्ण लोकप्रियता यामुळे ‘वऱ्हाड’ मराठी रंगभूमीवरील एक महत्त्वाचं आणि अविस्मरणीय सादरीकरण ठरत आहे.