
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
‘द इंडिया स्टोरी: स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला असून, कीटकनाशक शेती आणि त्याचा समाजाच्या आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम यावर भाष्य करण्यात आले आहे. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून दैनंदिन आहारातून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषारी रसायनांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
झी स्टुडिओज आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून, कथा, पटकथा आणि निर्मितीची जबाबदारी सागर बी. शिंदे यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटाच्या टीझरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे न्यायासाठी संघर्ष करताना दिसतात. तसेच कीटकनाशक शेतीमागील भयावह वास्तव आणि त्याचा विशेषतः तरुण पिढीच्या आरोग्यावर होणारा परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. भावनिक आणि सामाजिक आशय असलेल्या कथेद्वारे अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या गंभीर समस्येकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे.
चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक चेतन डीके म्हणाले, “‘द इंडिया स्टोरी’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर समाजाने एकत्र येऊन चर्चा करावी असा विषय आहे. कीटकनाशक शेतीमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर वास्तवावर आणि त्यातून उद्भवणाऱ्या आरोग्य संकटावर प्रकाश टाकण्याचा आमचा प्रयत्न आहे. टीझर ही या मोठ्या समस्येची केवळ एक झलक आहे. लोकांनी आपल्या ताटात नेमकं काय येतं, याबद्दल प्रश्न विचारावेत आणि जागरूक व्हावं, हा आमचा उद्देश आहे.”
या चित्रपटाबद्दल बोलताना श्रेयस तळपदे म्हणाला, “‘द इंडिया स्टोरी’कडे मला आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्याचा अत्यंत समर्पक विषय. कीटकनाशक शेती ही प्रत्येक घराशी संबंधित समस्या आहे, मात्र तिच्या दीर्घकालीन परिणामांचा आपण पुरेसा विचार करत नाही. माझ्या व्यक्तिरेखेद्वारे एका सामान्य वडिलांचा मोठ्या व्यवस्थेविरुद्धचा भावनिक संघर्ष प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, अशी आशा आहे. हा चित्रपट केवळ मनोरंजन करणार नाही, तर एका महत्त्वाच्या चर्चेलाही सुरुवात करेल.”
अभिनेत्री काजल अग्रवाल म्हणाली, “‘द इंडिया स्टोरी’ हा प्रभावी सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे. आई म्हणून ही कथा मला वैयक्तिक पातळीवर खूप भावली. आज अनेक पालकांच्या मनातील भीती आणि चिंतेचं प्रतिबिंब या कथेत दिसतं. हा चित्रपट लोकांना त्यांच्या अन्नाबाबत आणि त्याचा पुढील पिढ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत अधिक जागरूक करेल, अशी अपेक्षा आहे.”
या चित्रपटाचे सहनिर्माते स्वाती विनायक सैंदाणे, अनिता जाधव, विनायक सैंदाणे, कल्पेश शाह, देवयानी खोराटे आणि प्रेम जोशी आहेत. तर छायाचित्रण निशांत भागवत, संगीत मंगेश धाकडे, संकलन आशिष म्हात्रे, गीतकार शकील आझमी आणि ध्वनी संयोजन अनमोल भावे यांनी केले आहे.
कीटकनाशक शेतीसारख्या संवेदनशील विषयावर आधारित ‘द इंडिया स्टोरी: स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’ हा चित्रपट सामाजिक जनजागृतीसह प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.