
'आता सचिन अहिरांच्या रोज आरत्या करू का?' आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल; पक्षांतरावर पहिली प्रतिक्रिया
विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, “आता आम्ही सचिन अहिरांच्या रोज आरत्या करू का?” असा उपरोधिक सवाल त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर, “अहिरांच्या घरातील सदस्यांना ठाकरे गटाने किती पदे आणि किती संधी दिल्या, याची मोजदाद केली पाहिजे,” असे म्हणत त्यांनी पक्षाने दिलेल्या राजकीय संधींची आठवण करून दिली. आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे पक्षांतराच्या राजकारणावरही टीका केली. त्यांनी सांगितले की, शिवसेनेने अनेक नेत्यांवर विश्वास ठेवून त्यांना मोठी पदे दिली, मात्र सत्तेच्या आणि पदाच्या राजकारणामुळे काही जण पक्ष सोडत आहेत. अशा कृतीमुळे जनतेचा विश्वासघात होत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या राजकारणावर थेट टीका केली आहे. हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र फडणवीस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या लोकांना पदे दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मराठी पंतप्रधानांचे पंख छाटण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सचिन अहिर यांनी महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला या पदासाठी शिंदे गटाकडून इतर नावांची चर्चा होती. मात्र ऐनवेळी सचिन अहिर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी ठाकरे गटातील सहा खासदारांनीही शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्या धक्क्यातून पक्ष सावरत असतानाच आता विधान परिषदेतील महत्त्वाच्या चेहऱ्यानेही साथ सोडल्याने ठाकरे गटासमोर संघटनात्मक आणि राजकीय आव्हाने अधिक वाढली आहेत. सचिन अहिर यांच्या पक्षांतरामुळे मुंबईतील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि भविष्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.