
'सचिन अहिर आणि मी रात्री 9 वाजेपर्यंत सोबत होतो...'; अहिरांच्या फुटीनंतर अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या पक्षांतरानंतर आता आणखी एक मोठा राजकीय धक्का ठाकरे गटाला बसला आहे. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार सचिन अहिर यांनी मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या घडामोडीनंतर ठाकरे गटातील नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.
सचिन अहिर यांच्या पक्षांतराबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “सचिन अहिर आणि मी काल रात्री 9 वाजेपर्यंत सोबत होतो. आम्ही एकत्रच निघालो होतो. पण सकाळी त्यांनी असा निर्णय घेतला. त्यावर आता काय बोलणार?” त्यांच्या या वक्तव्यातून अहिरांच्या निर्णयामुळे त्यांना बसलेला धक्का आणि आश्चर्य स्पष्टपणे जाणवत होते.
अहिरांच्या पक्षांतरामुळे वरळी मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर परिणाम होणार का, असा प्रश्न विचारला असता दानवे म्हणाले की, “विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आम्ही अर्ज भरला आहे. निवडणुकीचं चित्र उद्या स्पष्ट होईल. मात्र वरळीत कोणतंही आव्हान निर्माण होणार नाही. वरळी ही शिवसेनेचीच जागा आहे. यापूर्वी सुनील शिंदे यांनी सचिन अहिरांचा पराभव केला होता.”
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनीही सचिन अहिर यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. “मला कोणतीही ऑफर आलेली नाही. आम्ही सर्वजण उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत. जे एकनिष्ठ आहेत, ते शेवटपर्यंत एकनिष्ठच राहतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबईतील ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनीही अहिरांच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “आम्हालाही हा मोठा धक्का बसला आहे. आम्ही त्यांना भाऊ म्हणायचो. पक्षाने त्यांना आमदार केलं, त्यांच्यावर कधीही अन्याय केला नाही. तरी त्यांनी हा निर्णय का घेतला, हे आम्हालाही समजलेलं नाही.”
मंगळवारी सकाळी सचिन अहिर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी अधिकृतपणे शिंदे गटात प्रवेश केला. या घडामोडीमुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.