
महायुतीत पुन्हा धुसफूस! शेकडो शिंदे शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश; कल्याण-डोंबिवलीत राजकीय संघर्षाला नवे वळण
ठाकुर्ली परिसरातील शेकडो शिंदे (Shivsena ) गटातील शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केल्याने कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पक्षप्रवेशामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
या घडामोडीनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया देताना, “भाजपची चाल कासवासारखी असते, पण ती ठाम आणि दूरगामी असते. एकाच्या बदल्यात चार कार्यकर्ते आमच्याकडे येतील,” असा दावा केला. या विधानातून आगामी काळात आणखी मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होण्याचे संकेत देण्यात आले.
शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले अर्चित खडकूल यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर गंभीर नाराजी व्यक्त केली. त्यांनी आरोप केला की, पक्षासाठी सातत्याने मेहनत घेऊनही त्यांना योग्य वेळी जबाबदारी किंवा पद देण्यात आले नाही. एवढेच नव्हे तर, एका बैठकीत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचाही आरोप त्यांनी केला.
खडकूल यांच्या म्हणण्यानुसार, पक्षात तळागाळातील कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेतली जात नव्हती. एका बैठकीदरम्यान एका पदाधिकाऱ्याला सर्वांसमोर बाहेर जाण्यास सांगण्यात आले. या घटनेमुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. पक्षात सन्मान आणि कामाला योग्य न्याय मिळत नसल्याची भावना वाढत गेल्याने अखेर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही आठवड्यांपासून कल्याण-डोंबिवलीमध्ये दोन्ही पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पक्षांतराचे सत्र सुरू असून, त्यामुळे महायुतीतील अंतर्गत समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही पक्षांकडून संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, KDMC निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी पक्षांतरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम स्थानिक राजकीय समीकरणांवर होऊ शकतो. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील आगामी महापालिका निवडणूक केवळ विरोधकांविरोधातील लढत न राहता, महायुतीतील अंतर्गत वर्चस्वाचीही परीक्षा ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Raj Thackeray on KDMC: कल्याण-डोंबिवलीच्या स्थितीवरून राज ठाकरेंचा संताप; “बाळासाहेब आज असते तर…”