
Navnath Ban criticizes MP Sanjay Raut over the NCP party's merger political News
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी खासदार राऊतांवर निशाणा साधला. शरद पवारांचे दलाल आणि मुखिया म्हणून राऊतांची नियुक्ती झाली आहे का असा सवालही बन यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, “राऊत उबाठा गटाचे खासदार, प्रवक्ते म्हणून मिरवतात. मात्र प्रत्यक्षात ते राजकीय भूमिका शरद पवारांच्या हिताची घेतात. उबाठा गटाचे प्रवक्ते असताना प्रत्येक पक्षाच्या कारभारात नाक खुपसायचे काम राऊतांनी तात्काळ बंद करावे. प्रफुल्ल पटेल यांचे पाय कुठे आहेत हे बघण्याच्या भानगडीत राऊतांनी पडू नये. अजितदादा यांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल महाराष्ट्राला पटेल अशी समतोल भूमिका घेत आहेत,” असे देखील बन म्हणाले आहेत.
हे देखील वाचा : पिंपरी चिंचवड महापालिकेचा ७०२ कोटींचा मालमत्ता कर वसूल
तसेच “राऊतांचे दोन पाय शरद पवार राष्ट्रवादीमध्ये, हात काँग्रेसमध्ये आहेत अशा स्थितीत उबाठा गटामध्ये राऊतांचे डोके तरी आहे का ? की डाव्या आघाडीकडे डोके गहाण ठेवले आहे असा बोचरा सवाल नवनाथ बन यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर संगमा, तारीक अन्वर, अरुण गुजराती यांनी पक्षहितासाठी प्रामाणिकपणे काम केले. आज अचानक ‘पटेल’ या नावावर आक्षेप घेत राऊत राजकारण करत आहेत,” असा टोला नवनाथ बन यांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : लाडकी बहीण योजनेबाबत ‘ही’ मोठी मागणी; CM फडणवीस म्हणाले, “अनेक…”
राष्ट्रवादीचा ताबा घेण्यासाठी टपून बसलेला डोम कावळा
पुढे नवनाथ बन म्हणाले की, “अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाचा ताबा मिळवण्यासाठी काही डोमकावळे टपून बसले आहेत. त्या डोम कावळ्यांपैकी एक राऊत आहेत. अशा डोम कावळ्यांपासून राष्ट्रवादी पक्षाने सावध राहण्याची गरज आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील, दोन्ही कुटुंबे एकत्र येणार असतील, तर भाजपाचा त्याला विरोध नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण करायचे की नाही, हा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घ्यायचा आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा आहेत. महापालिकांमध्ये उबाठा गटाला एकही जागा मिळालेली नसून, पक्षाचे संघटन देखील अस्तित्वात राहिलेले नाही. तसेच कर्जत-जामखेडमध्ये जनतेने रोहित पवारांना नाकारले होते. निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वापर केला नसता, तर त्यांचा पराभव निश्चित होता,” असा आरोपही नवनाथ बन यांनी केला आहे.