दिल्लीतील पराभवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यामध्ये त्यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमधून फडणवीसांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर तुफान हल्लाबोल केला. राहुल गांधी यांच्या भ्रामक विचारांमुळे देशात अराजक निर्माण करण्याचा कट करणाऱ्या शक्तींना बळ मिळत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
राहुल गांधी यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीपेक्षा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत 40 लाख मतदार वाढल्याचा दाखला देऊन हे भारतीय जनता पक्षाचे ‘व्होट इंजीनियरिंग’ असल्याचा आरोप केला होता. या आरोपाचा फडणवीस यांनी समाचार घेतला. फडणवीस म्हणाले की, “राहुल गांधी यांनी आपल्या पराभवाच्या कारणांचा शोध घेतला तरच त्यांचा पक्ष टिकून राहू शकेल. मात्र, ते केवळ बहाणेच शोधत राहिले तर आगामी काळात काँग्रेसची अवस्था आणखी बिकट झाल्याशिवाय राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांमध्ये तब्बल एक कोटी मतांचा फरक असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “राहुल गांधी हे सतत भ्रमात राहणारे नेते आहेत. जनतेने त्यांची साथ सोडली आहे याची जाणीवही त्यांना होत नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासारख्यांना बरोबर घेऊन त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या तर त्यांचे विचारही तसेच राहणार. मात्र या भ्रामक विचारांमुळे राजकतावाद्यांना बळ मिळत आहे. देशातील संवैधानिक यंत्रणाबाबत अपप्रचार करून त्यांच्याबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा 180 अराजकतावादी संघटनांचा कट आहे. राहुल गांधी यांच्या भ्रामक विधानांमुळे त्यांना बळ मिळते आहे,” असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अपडेट घ्या एका क्लिकवर
लोकसभा निवडणुकीमध्ये अपेक्षित का मिळाले नाही याबाबत देखील देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत भाजपची लढाई या अराजकतावादी संघटनांशी होती. त्यांनीच भाजपबद्दल अनेक ‘फेक नरेटिव्ह’ मतदारांमध्ये पसरवली. त्याला तोडीस तोड उत्तर देण्यात आम्ही कमी पडलो. विधानसभा निवडणुकीत मात्र अशा अपप्रचाराला सडेतोड उत्तर देण्याची यंत्रणा संघ परिवारातच असल्याचे लक्षात घेऊन आम्ही संघ परिवारातील विविध संस्था संघटनांच्या सहकार्याने उत्तम कामगिरी करू शकलो,” असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाबाबद फडणवीसांचा खुलासा
भाजप आणि शिवसेना युती अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदावरून संपुष्टात आल्याची टीका करण्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी मत व्यक्त केले आहे. वास्तविक तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि तत्कालीन शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात निवडणुकीपूर्वीच साटेलोटे झाले असल्याचा दावा त्यांनी केला.