
नाशिक निवडणुकीत तिरंगी ट्विस्ट! दराडे-गीते-हिरे आमनेसामने, बिनविरोधचा प्लॅन फेल
तीन उमेदवार रिंगणात असल्यामुळे या निवडणूकीची चुरस वाढली असून, शिंदे सेनेकडून बिनविरोध निवडणूक करण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. माघारीच्या दिवशी सकाळपासूनच सर्वांची उत्सूकता ताणली गेली होती. दहा वाजेपासूनच शिंदे सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दुपारी बारा वाजता उपमहापौर विलास शिंदे यांनी राष्ट्रवादीचे गोरख बोडके व विष्णुपंत म्हैसधुणे यांना सोबत घेवून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या दोघांनीही एका पाठोपाठ माघार घेतली. यावेळी आमदार हिरामण खोसकर हे देखील उपस्थित होते. दोघांनी माघार घेतल्यानंतर म्हैसधुणे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना काल मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याशी चर्चा करून युतीचा धर्म पाळण्याचे आवाहन केले तसेच सुनील तटकरे यांनी देखील समजूत काढली. युतीचा धर्म पाळण्याचे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आवाहन केल्यामुळे आपण माघार घेतल्याचे सांगितले. त्यानंतर मात्र निवडणूक रिंगणातील अपक्ष परवेज कोकणी, कुणाल दराडे, इस्लाम पार्टीचे मोहम्मद रशीद यांनीही माघार घेतली.
या निवडणूकीतील प्रबळ दावेदार गणेश गिते यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री, कुकुंभमेळामंत्री यांच्याशी चर्चा करून उमेदवारी मागे घेण्याची तयारी दर्शविली असली तरी, ते माघार घेणार काय या विषयीची उत्सूकता ताणली गेली होती.
गिते सकाळी नाशकात परतले, परंतु त्यांचे बंधू गोकूळ गिते है नॉट रिचेबल होते, त्याच वेळी हॉटेल ट्रीटमध्ये मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे व गणेश गिते यांची बैठक होवून त्यात दोन्ही बंधुंनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न करण्यात आले.
गणेश गिते यांनी युतीचा धर्म पाळून माघार घेण्याचे कबुल केले तथापि, या निवडणूकीत आपल्यावर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखविली. त्यानंतर गिते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. त्यांनी २ वाजून ४० मिनीटांनी माधार घेतली. यावेळी महाजन समर्थक निलेश बोरा हे देखील त्यांच्या समवेत होते, बोरा यांनी अर्ज नेला परंतु त्यांनी अर्ज दाखल केला नाही.
गुरुवारी दुपारनंतर प्रचाराला सुरुवात झाली असून उमेदवारांना ५६ तारेखपर्यंत प्रचार करता येणार आहे. त्यानंतर १८ जूनला जिल्हाभरातील एकूण ९ केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार असून वयात ६९९ मतदार मतदार मतदानाचा हक्क बाजवणार आहेत. तर २२ जूनला मतमोजणी पार पडणार आहे.
दरम्यान, गणेश गिते है माघार घेण्यासाठी आले असता, गोकूळ गिते यांनाही माघारीसाठी बोलविण्यासाठी एका कार्यकर्त्याने भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी मुख्यमंत्री व कुंभमेळामंत्र्यांचे कार्यकर्ते असल्याने आपल्याला माघार घ्यावी लागेल अशी गळ गोकूळ गिते यांना घातली. त्यावर गोकूळ गिते यांनी ‘ज्यांनी माझा बाप काढला, त्यांच्यासाठी माधार का घ्यायची’ असा सवाल केला, ‘दराडे अजुन निवडून आले नाहीत, तरी त्यांची भाषा दादागिरीची व शिवीगाळीची असेल तर पुढे कसे होणार असा सवाल करून आपण कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही’ असे सांगितले. यावेळी गणेश गिते यांनीही गोकूळ गिते यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी फोन कट करून टाकला.
सत्ता व पैशाचा माज असलेल्यांविषयी मतदारांच्या मनात तिटकारा आहे. राजकारणातील स्वच्छ चारित्र्याची व विचारवंताची गरज भरून काढण्यासाठी आपली उमेदवारी आहे. निवडून येण्याची खात्री असल्यानेच निवडणूकीत अपक्ष म्हणून उमेदवारी करीत असल्याची प्रतिक्रीया अपक्ष उमेदवार प्रसाद हिरे यांनी व्यक्त केली आहे.