त्या' खासदारांना भाजपमध्ये यायचे होते, पण आम्ही दारे बंद ठेवली; देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
एका डिजीटल वृत्तवाहिनीशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत खुलासा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. त्याचवेळी दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भूमिकेबाबतही चर्चा सुरू होत्या. उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी हा दाला फेटाळून लावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ठाकरेंच्या 6 खासदारांपैकी एक-दोन जणांनी भाजपमध्ये त्यांना प्रवेश मिळावा, अशी मागणी केली होती. पण भाजपने त्यांच्यासाठी दारे बंद केली होती. या खासदांचा मूळ पक्ष शिवसेना हा आहे. ते शिवसेनेमधून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावाय तसेच त्यांना आमच्या पक्षात घेण्यासाठी आमच्याकडे सध्या काही तशी कोणतीही व्यवस्था नाही.” असं आमची भूमिका होती.
“आमच्या मित्रपक्ष शिंदे गटाकडून हे ऑपरेशन झाले आहे. राजकारणात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्याचे सर्व तपशील जाहीर करायचे नसतात. शिंदे गटाला आमचा योग्य तो पाठिंबा होता. त्यांना हवी असणारी आवश्यक ती सर्व मदत आम्ही नक्कीच केली. पण यापलीकडे जास्त काही सांगणे सूज्ञ राजकारणाचे लक्षण नाही. ” अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.
फडणवीस म्हणाले की, ” राजकारणात प्रत्येक जण आपले भविष्य पाहत असतो. ज्या नेतृत्त्वासोबत आपण काम करत करतो,तिथे सुरक्षित भविष्य नाही, असे वाटल्यावर जिथे भविष्य सुरक्षित दिसते तिथे लोक जातात. आम्ही अडीच वर्षे विरोधात असतानाही आमचा एकही आमदार किंवा खासदार फुटला नाही. कारण आम्ही सरकारला एकही दिवस शांत झोपू दिले नाही. आमच्या नेत्यांवर आमचा असाच विश्वास असायचा. जेव्हा नेता असा आत्मविश्वास वाढवू शकत नाही, तेव्हा पक्ष संपतात,” असा खोचक टोलाही त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. –






