माजी खासदार विनायक राऊत यांची ठाकरे गट नेते राजन साळवी यांच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - एक्स)
रत्नागिरी : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न मिळाल्यामुळे नाराज आहेत. तर पराभव सहन करावा लागल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये देखील नाराजी आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे सध्या नाराज आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण नाराज नसल्याचे सांगितले असले तरी देखील चर्चा कमी झालेली नाही. त्याचप्रमाणे राजन साळवी हे भाजपच्या वाटेवर असल्याचे देखील बोलले जात आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजन साळवी यांच्या नाराजीवर भाष्य केले आहे. विनायक राऊत म्हणाले की, राजन साळवी यांना मातोश्रीवर बोलावले आहे. विधानसभा निवडणूक वेळी लांजा किंवा राजापूरमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभा लावल्या होत्या.पण त्या त्यांनी नाकारल्या होत्या. राजन साळवी उद्धव ठाकरे यांना कधीही फोन करून बोलू शकतात. राजन साळवी यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत कारण ते पक्षाशी कायम प्रामाणिक राहतील, असा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच ठाकरे गटातील नाराज नेते राजन साळवी हे भाजपच्या वाटेवर असल्याचे देखील बोलले जात आहे. यावर विनायक राऊत म्हणाले की, “पैसा आणि सत्तेच्या जोरावर सध्याचे राजकारणी विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलावत आहेत. ज्यांनी स्वतःला विकायला ठेवले आहे त्यांचं सोडा, पण निष्ठावंतांच्या जोरावर शिवसेना पुन्हा गरुड झेप घेईल. पक्ष वाढवणे आणि सांभाळणे ही जबाबदारी आदित्य आणि उद्धव ठाकरे मेहनतीने करत आहेत. काही जणांना रेडिमेट कार्यकर्ते मिळून पक्ष वाढवला जात असेल तर त्याला काही करू शकत नाही, अशा शब्दांत माजी खासदार विनायक राऊत यांनी टोला लगावला आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे विनायक राऊत म्हणाले की, आत्ताच्या निवडणुका मेरीटवर होत आहेत का? हा मोठा प्रश्न आहे. सध्याची इलेक्शन प्रोसिजर ही करप्ट इलेक्शन प्रोसिजर आहे. बॅलेट पेपर वरच निवडणूका झाल्या पाहिजेत. यापूर्वी बॅलेट पेपरवर ज्या निवडणुका झाल्या त्यात शिवसेना क्रमांक एकचा पक्ष आहे. आता चिटसोबत सरसकट पाकिट दिले जाते. निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून वारेमाप वापर करण्यात येत आहे. ते आव्हान इतर पक्षांसोबत शिवसेनेसमोर देखील आहे. मुंबई महानगरपालिकेला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू आहे. आम्ही कामाला सुरुवात केली आहे. मुंबई वाचवण्यासाठी मुंबईकर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ताब्यात महानगरपालिका देतील. स्वबळाची तयारी हा नंतरचा प्रश्न आहे. मुंबईचा महापौर हा परप्रांतीय असेल असा भाजपने जाहीर केलं आहे, असा दावा माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.