
Jantar Mantar Protest, Cockroach Janata Party, Abhijit Dipke, Saurabh Das,
CJP Protest News: दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पक्षाने (CJP) त्यांच्या एका कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यात संबंधित कार्यकर्ता गंभीर जखमी झाल्याचे पक्षाने म्हटले आहे. आंदोलनाला लक्ष्य करून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि पक्षाचे प्रवक्ते सौरभ दास यांनी केला आहे. तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी दिल्ली पोलिसांकडे केली आहे.
सीजेपीच्या माहितीनुसार, पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली असली तरी हल्ल्यात अंदाजे १५ जण सहभागी होते. मात्र, उर्वरित आरोपींवर अद्याप कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर जखमी व्यक्तीच्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तिने काही गंभीर आरोप केले आहेत. काही लोकांनी तिला रस्त्यावर घेरले होते. त्यावेळी तिच्या वडिलांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याचा दावा तिने केला आहे.
या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच हत्येचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनी केली आहे. हल्ला आणि सोशल मीडियावरील धमक्यांबाबत दिल्ली पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
सौरभ दास म्हणाले की, हल्लेखोरांनी शांततापूर्ण आंदोलनाला लक्ष्य करून आंदोलकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वैद्यकीय अहवालात जखमी व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, पोलिसांनी ही दुखापत किरकोळ असल्याचे सांगितल्याचा आरोप त्यांनी केला.
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व आरोपींची ओळख पटवून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. एका व्यक्तीला अटक करण्यात आली असली तरी हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींना अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, नीट-यूजी परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि अनियमिततेच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. ही मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आंदोलनाच्या आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.