संजय दिना पाटील प्रकरणावरून संजय राऊतांचा संताप
शिंदे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर आणि संबंधितांवर जोरदार टीका केली.
संजय राऊत म्हणाले की, “राज्यात सध्या धमक्या, खंडणी, हत्या आणि गुंडगिरीचे प्रकार वाढले आहेत. पत्रकारांना उघडपणे धमक्या दिल्या जात असताना मुख्यमंत्री त्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. ते हसत हसत ते उडवून देतात,” असा आरोप त्यांनी केला. देशभरातील पत्रकार संघटनांनी याविरोधात आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
राऊत यांनी भूतकाळातील पत्रकार निखिल वागळे प्रकरणाचा संदर्भ देत सांगितले की,” काही वर्षांपूर्वी पत्रकार निखिल वागळे आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद झाला होता. त्यावेळी आम्ही त्यांना ठार मारण्याची धमकी दिली नव्हती. पण त्यावेळेला देशभरातील पत्रकार शिवसेना भवनासमोर आले होते. पत्रकारांवर हल्ला झाला म्हणून कारवाईची मागणी त्यांनी केली होती. आत ते पत्रकार कुठे आहेत? पत्रकार या देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, पण केंद्रातले मोदी आणि अमित शहा मनात नाहीत.”
पत्रकारांना दिलेल्या धमकीबाबत मुंबई पोलिसांनी आणि गृहमंत्रालयाने कोणताही राजकीय पक्षपात न करता कारवाई करावी, अशी मागणी राऊत यांनी केली. कॅमेऱ्यासमोर हत्या आणि स्मशानाची भाषा करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे ते म्हणाले. मुंबईचे पोलीस आयुक्त सक्षम आहेत, मात्र एखादा लोकप्रतिनिधी त्यांना जुमानत नसेल तर त्याला कायद्याची जाणीव करून द्यावी, असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रातील परिस्थितीची तुलना बिहारशी करत त्यांनी कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
स्वतः शिवीगाळ केल्याच्या आरोपांबाबत बोलताना राऊत म्हणाले की, एखाद्याला राजकीय टीका करणे आणि थेट जीवे मारण्याची धमकी देणे यात मोठा फरक आहे. गद्दारी करणाऱ्यांना गद्दार म्हणणे चुकीचे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत ते म्हणाले कि , “मी जर शिवी दिली असेल तर दाखवा. एखाद्याला शिवी देणं आणि एखाद्याला हत्येची धमकी देणं, यामधील फरक उपमुख्यमंत्र्यांना समजत नसेल तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांची अक्कल नेमकी कुठे हरवली? त्यासाठी एसआयटी स्थापन करावी,” असे ते म्हणाले.
“मी गद्दारांना शिवी दिली. गद्दारांना गद्दारचं म्हंटलं पाहिजे, त्यांच्यासाठी महात्मा किंवा आचार्य हे पर्यायी शब्द होऊ शकत नाहीत,” असे ते म्हणाले. संजय दिना पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावत ते पुढे म्हणाले, “कुणी कोणाला ठार मारले आणि कोणत्या कारणावरून मारले याच रेकॉर्ड आमच्याकडे आहे. तो शिवसेनेचा वाद नव्हता. तो दोन दारू गुत्तेदारांचा वाद होता आणि त्यामध्ये हत्त्या झाली,” असेहि ते म्हणाले.






