
abhijeet dipke on jarange patil
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू केलं असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या आंदोलनाला विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत.
कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनीही जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. समाजातील मुलांना योग्य शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असत्या, तर जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याची वेळ आली असती का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एखादी व्यक्ती आंदोलनाचा मार्ग स्वीकारते, तेव्हा तो तिच्यासाठी शेवटचा पर्याय असतो, असं अभिजीत दिपके म्हणाले. सरकारने आंदोलनकर्त्यांना चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याची संधी द्यायला हवी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सरकारने तातडीने चर्चा करावी आणि काही ना काही तोडगा काढावा, असं आवाहन दिपकेंनी केलं. आंदोलन लांबवून परिस्थिती अधिक चिघळण्यापेक्षा संवादातून प्रश्न सोडवणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
मराठा समाजातील मुलांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळाव्यात, यासाठी जरांगे पाटील भूमिका मांडत असल्याचं दिपके म्हणाले. त्यांच्या मागण्यांकडे केवळ आंदोलन म्हणून न पाहता त्यामागील सामाजिक प्रश्न समजून घेण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मनोज जरांगे पाटील यांची आपण लवकरच भेट घेणार असल्याचंही दिपकेंनी सांगितलं. जरांगे दिल्लीपर्यंत आले होते, तर आपणही त्यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीपर्यंत जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
अभिजीत दिपके यांनी यावेळी त्यांच्या आधीच्या आंदोलनाचाही संदर्भ दिला. काही परीक्षा आणि विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवर सरकारकडून अद्याप अपेक्षित निर्णय झालेला नसल्याचा आरोप त्यांनी केला.
विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या प्रश्नावरही तोडगा निघालेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारकडून न्यायालयाचा मुद्दा पुढे केला जातो; मात्र आवश्यक यादी दिल्यास त्यावर कार्यवाही करण्याची तयारी असल्याचं सांगितलं जात असतानाही संबंधित यादी दिली जात नसल्याचा दावा त्यांनी केला.
अंतरवालीत जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस, फडणवीस, शिंदेंना दिला इशारा; नेमकं काय घडलं?
राज्यात विविध समाजघटकांकडून आंदोलनं सुरू असल्याचा दावा करत दिपकेंनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचाही त्यांनी उल्लेख केला.
दरम्यान, आगामी काळात जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनापेक्षाही मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा अभिजीत दिपके यांनी दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनासोबतच इतर प्रश्नांवरील आंदोलनांमुळे राज्यातील वातावरण पुढील काळात आणखी तापण्याची शक्यता आहे.