
MLA Rohit Pawar social media post on Ajit Pawar death politics in maharashtra
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर अवघ्या चार दिवसांमध्ये त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. मात्र त्या परिस्थितीमध्ये आणि सुतकामध्ये अगदी तातडीने शपथविधी सोहळा झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्यावरुन देखील राजकारण सुरु झाले. जेष्ठ नेते शरद पवार यांनी 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या असा अजित पवारांनी निर्णय घेतल्याचे सांगितले, यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला. यावरुन वाद सुरु असताना रोहित पवारांनी चालू राजकारणावर रोष व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा : राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन रंगलं राजकारण! शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना धरलं धारेवर
आमदार रोहित पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच सध्याच्या राजकारणाच्या स्तरावरुन टीका केली आहे. रोहित पवार यांनी लिहिले आहे की, “आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय… छक्के-पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात रहावं का? असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही…!” अशी पोस्ट आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
आजचं राजकारण हे किळसवाणं आणि घृणास्पद झालंय. या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय… छक्के-पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तीने खरंच राजकारणात रहावं का? असा प्रश्न माझ्यासारख्याला पडल्याशिवाय राहत नाही…! — Rohit Pawar (@RRPSpeaks) February 4, 2026
हे देखील वाचा : सुनेत्रा पवार यांच्याकडेच असतील राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे; येत्या 9 फेब्रुवारीला…
यापूर्वी देखील रोहित पवारांनी अजित पवारांबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी लिहिले आहे की, “माननीय अजितदादा गेल्यापासून अनेकजण राजकीय चर्चा करताना दिसतायत, पण आज कोणत्याही राजकीय चर्चेपेक्षा मा. अजितदादांच्या जाण्याच्या दुःखाची व्याप्ती कितीतरी पट मोठी आहे. मा. अजितदादा आपल्यात असते तर चित्र वेगळं असतं आणि दादांशिवाय कुणीही त्यावर चर्चाही केली नसती, पण आज दादाच आपल्यात नाहीत. त्यांचं जाणं हे आपल्या सर्वांवरच आभाळ कोळसल्यासारखं आहे आणि अशा वातावरणात कुणीही राजकीय चर्चा करणं योग्य वाटत नाही. त्यामुळं पवार कुटुंबातील एक सदस्य म्हणून माझी सर्वांनाच हात जोडून विनंती आहे की, दादांच्या आत्म्याला क्लेश होईल, त्यांच्या विचारांना ठेच पोचेल आणि त्यांच्या स्पष्ट व परखड स्वभावाला साजेसं वाटणार नाही असं तूर्तास तरी कुणीही न बोलणंच अधिक योग्य ठरेल. भविष्यात यथावकाश चर्चा करायला काही अडचण नाही पण त्यासाठीची योग्य वेळ आज नाही, हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे…!” असे देखील आमदार रोहित पवार यांनी लिहिले होते.