
मनसेला रायगडमध्ये मोठा धक्का! बड्या नेत्यासह 55 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; राज ठाकरेंच्या पक्षात खळबळ
राज्यातील राजकीय पक्षांमधील पक्षांतरांच्या घडामोडी सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रायगड जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून सुरू झालेल्या नाराजीचे रूपांतर आता मोठ्या राजकीय घडामोडीत झाले असून, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी राजीनामा दिल्यानंतर तब्बल 55 पदाधिकाऱ्यांनीही सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे.
रायगड जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या संदीप ठाकूर यांना डावलून मनसेने रामचंद्र उर्फ बाळा म्हात्रे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. या निर्णयानंतर पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा होती. माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनीही सोशल मीडियावरून अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले.
दरम्यान, संदीप ठाकूर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर 55 पदाधिकाऱ्यांनीही पक्षपदांचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात मनसेमध्ये मोठी फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
याचदरम्यान संदीप ठाकूर यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मात्र, या भेटीचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून ती केवळ कौटुंबिक भेट असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
पुढील राजकीय निर्णयाबाबत बोलताना संदीप ठाकूर म्हणाले की, “महिनाभरापासून मी माझ्या पुढील वाटचालीबाबत विचार करत आहे. आम्ही लोकांमध्ये राहून लोकहितासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत. आम्हाला सोबत घेऊन जाणारे नेतृत्व संधी देत असेल तर त्याबाबत विचार करू. अंतिम निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतला जाईल.”
खासदारानंतर आता आमदारांचं ‘ऑपरेशन टायगर’? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला चार आमदारांची दांडी
एका बाजूला संदीप ठाकूर यांचा राजीनामा आणि दुसऱ्या बाजूला 55 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे यामुळे मनसेसमोर रायगडमध्ये संघटनात्मक आव्हान निर्माण झाले आहे. या नाराजीचे रूपांतर पुढे मोठ्या राजकीय हालचालीत होते का, तसेच संदीप ठाकूर कोणता निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.