
MP Sanjay Raut Press Conference on LPG Gas Shortage in india due to Iran-Israel War
Maharashtra Politics : मुंबई : आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धजन्यपरिस्थितीमुळे भारतातील सामान्य लोकांना फटका बसला आहे. व्यावसायिक गॅसचा तुटवडा (LPG Gas) निर्माण झाला असून ते मिळवणे कठीण झाले आहे. गॅस मिळवण्यासाठी एजन्सीबाहेर रांगा लागल्या आहेत. तर पेट्रोल संपेल या भीतीने पेट्रोल पंपावर देखील लांबच लांब रांगा आहेत. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आक्रमक झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी देशाला 50 वर्षे मागे नेले असल्याची टीका खासदार राऊतांनी (Sanjay Raut) केली.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच सध्या देशावर झालेल्या आखाती युद्धांच्या परिणामांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “देशामध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. परिस्थिती प्रधानमंत्री यांच्या हातातून बाहेर जाताना दिसत आहे. लोकांना आता रॉकेलच्या रांगेत उभे राहावे लागणार आहे. पंतप्रधान मोदींनी आम्हाला पुन्हा 50 वर्षांपूर्वीच्या परिस्थितीत नेले आहे. त्या काळात धान्य आणि रॉकेलच्या रांगा लागत असत, आणि आज पुन्हा जनतेला त्याच रांगेत उभे राहावे लागत आहे. ही परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिघडत जाणार,” असे मत खासदार संजय राऊतांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : शिंदे-महाडिक यांना मिळाला भाजपचा पहिला सभापती व उपसभापती होण्याचा मान
पुढे ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताला एकही खरा मित्र उरलेला नाही. शेजारी राष्ट्रांमध्येही नाही आणि बाहेरही नाही. जे मित्र होते, ते आपण गमावले आहेत. अशा वेळी मोदींना राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी लागत आहे.पण यासाठी सत्तावीस दिवस का लागले? ज्या दिवशी युद्ध सुरू झाले, त्याच दिवशी परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली होती. तेव्हाच सर्वपक्षीय बैठक दिल्लीत बोलावायला हवी होती आणि त्या बैठकीला स्वतः उपस्थित राहायला हवे होते.त्यानंतर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांशी चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक होते. आपण देशाचे नेते आहात, केवळ एका राज्याचे किंवा पक्षाचे नाही,” असा टोला खासदार राऊतांनी लगावला.
हे देखील वाचा : Ashok Kharat : “महिलांसोबत जे केलं तो विधीचाच भाग, जबरदस्ती नाही: पोलीस कोठडीत भोंदूबाबा खरातने उधळली मुक्ताफळं
“आता टीका करून काही उपयोग नाही, आणि टीका करणार कोण? अंधभक्त टीका करणार नाहीत. तीन लिटर रॉकेल हे त्यांच्यासाठी जणू तीर्थच आहे. मोदी तीन लिटर रॉकेल देत आहेत, हे त्यांच्यासाठी हिंदुत्वाचे तीर्थ आहे. पण देशातील सामान्य, गोरगरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला जर तीन लिटर रॉकेलवर गुजराण करावी लागत असेल, तर ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. ही परिस्थिती मोदी सरकारच्या चुकीच्या नियोजनामुळे आणि नेतृत्वाच्या अभावामुळे निर्माण झाली आहे.- देशभरात लोक रांगेत उभे आहेत आणि या भीतीचे वातावरण मोदींनीच निर्माण केले आहे. रॉकेलची टंचाई जाहीर केल्यामुळे लोकांमध्ये घबराट वाढली आहे. पेट्रोल-डिझेल कुठून आणणार? चीन आणि फ्रान्ससारख्या देशांमध्ये चार महिन्यांचा साठा आहे, तर आपल्या देशात एक आठवड्याचाही साठा उरलेला नाही, अशी माझी माहिती आहे. अशा वेळी सरकारने जनतेला विश्वासात घेऊन सत्य सांगणे गरजेचे आहे,” असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.