उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली (फोटो - टीम नवराष्ट्र)
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाची वक्तव्ये केली आहेत. खासदार संजय राऊत म्हणाले की, “अद्याप युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही, हा प्रश्न तुम्ही महायुतीला का विचारत नाही? महायुती नावचं जे त्रांगड आहे, एकत्र येणार एकत्र लढणार त्यांना प्रश्न विचारता का? ठाकरे बंधुंना हा प्रश्न का विचारता? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढत आहेत. महायुतीच्या लोकांना दिल्लीत जाऊन अमित शाहंच्या पायावर डोकं ठेवावं लागतं. आमच्याशी युती करा युती करा, बाबा लगीन, बाबा लगीन” असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.
हे देखील वाचा : आचारसंहिता जाहीर होताच इच्छुकांची धावपळ सुरू; कोल्हापर, इचलकरंजी महापालिका निवडणुकीला येणार रंगत
पुढे ते म्हणाले की, “सध्याच्या क्षणी उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत. मुंबई महापालिका, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, पुणे, नाशिक या प्रमुख सहा महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र लढत आहोत. इतर ठिकाणी दोन्ही पक्षांचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते निर्णय घेतील. पण ही लढाई 29 महापालिकांपेक्षा मुंबईची आहे. संयुक्त महाराष्ट्राची मुख्य लढाई मुंबईसाठी होती. मुंबई महाराष्ट्रात रहावी यासाठी होती. संयुक्त महाराष्ट्राचा लढा 1956 साली सुरु झाला. त्यासाठी 106 लोकांनी बलिदान दिलं. आम्ही मुंबई अमित शाहंच्या घशात जाऊ देणार नाही,” असा आक्रमक पवित्रा खासदार संजय राऊत यांनी घेतला आहे.
हे देखील वाचा : पुण्यात महायुती नाहीच? फडणवीसांची घोषणा; मात्र अजित पवारांच्या उत्तराने वाढवली उत्सुकता
माध्यमांनी संजय राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या युतीच्या अधिकृत घोषणेबाबत प्रश्न केला. ते म्हणाले की ‘येत्या आठवड्यात घोषणा व्हायला हरकत नाही’ असं उत्तर संजय राऊत यांनी दिलं. “प्रक्रिया सुरु झालेली आहे. एक तारखे नंतरचे पुढचे 14-15 दिवस प्रचाराचे आहेत. आता जेव्हा दोन पक्षाचे प्रमुख एकत्र येतात, तेव्हा त्यांचा काहीतरी कार्यक्रम ठरलेला असेलच, घोषणा करण्याचा, जागा वाटपाचा हे जर असेल, तर तुमच्या मनात अशा शंका येता कामा नये” असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे आता निवडणूका जाहीर झाल्यानंतर तरी ठाकरे बंधूंची युती जाहीर होण्याची शक्यता आहे.






