
विधान परिषद निवडणुकीत शेवटच्या क्षणी काँग्रेसची मोठी घोषणा (Photo Credit- X)
शिवसेना ठाकरे गटाने अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्याकडून झालेल्या मनधरणीला यश आले आहे. “उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाला आम्ही समर्थन देत आहोत आणि काँग्रेस या निवडणुकीत आपला उमेदवार देणार नाही,” असे हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर केले. यामुळे आता अंबादास दानवे यांचा मार्ग सुकर झाला आहे.
उमेदवारीला पाठिंबा दिला असला तरी, काँग्रेसने आपली नाराजी मात्र बोलून दाखवली आहे. “उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेसाठी उमेदवार घोषित करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करायला हवी होती,” अशा शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी मित्रपक्षाला सुनावले. सुरुवातीला काँग्रेसने स्वतःचा उमेदवार देण्याचे संकेत दिले होते, मात्र आघाडीची एकजूट टिकवण्यासाठी काँग्रेसने एक पाऊल मागे घेतल्याचे दिसत आहे.
काँग्रेसने यापूर्वी स्पष्ट केले होते की, जर स्वतः उद्धव ठाकरे निवडणूक लढवणार असतील तरच त्यांना पाठिंबा दिला जाईल. मात्र, ऐनवेळी अंबादास दानवे यांचे नाव समोर आल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा दावा केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती.
मोठी बातमी ! बच्चू कडू करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; आता ‘प्रहार’चे काय होणार?
निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार, आज ३० एप्रिल २०२६ हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. यानंतर, २ मे रोजी अर्जांची छाननी केली जाईल आणि उमेदवारांना ४ मे पर्यंत आपली उमेदवारी मागे घेण्याची मुदत असेल. जर आवश्यकता भासली, तर १२ मे रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ४:०० या वेळेत मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५:०० वाजता मतमोजणी सुरू होईल.
विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता, महायुतीला (ज्यामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश आहे) वरचढ स्थान असल्याचे दिसून येते. भाजपने आपल्या कोट्यातून सहा उमेदवार रिंगणात उतरवले आहेत; यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक आणि प्रज्ञा सातव यांसारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करण्यासाठी झीशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने अंबादास दानवे यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले आहे. तर, शिवसेना शिंदे गटाकडून निलम गोऱ्हे आणि बचू कडू यांचा नावांचा सामावेश आहे.
पश्चिम बंगालनंतर आता भाजपची नजर ‘या’ सात राज्यांवर; निवडणुकीची मोर्चेबांधणी केली सुरु