
ऑपरेशन टायगर यशस्वी; सहा खासदारांच्या फोडाफोडीत फडणवीसांची शिष्टाई ठरली निर्णायक
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून, शिवसेना (ठाकरे गट) आणि महायुतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातील काही खासदारांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याचे बोलले जात आहे.
राज्यात शिवसेना (ठाकरे गट) खासदार फोडफोडीचे राजकारण रंगात आले असताना पूर्णपणे मौन बाळगून असलेल्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सूचक विधान करत धक्का दिला होता. ऑपरेशन यशस्वी झाले आहे आणि रुग्ण एकदम सुदृढ आहे, त्यामुळे कोणीही काळजी करण्याची गरज नाही, असे म्हणत मुख्यमंत्री प्रथमच या सर्व घडामोडींवर उघडपणे व्यक्त झाले होते. कारण ऑपरेशन टायगरचे तर ठरले होते. परंतु त्यांना भाजपमध्ये घ्यायचे की शिवसेनेत हेच ठरत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याबाबत मौन बाळगले होते.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना सुरुवात झाली होती. जानेवारी २०२६ पासून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या विषयावर गांभीर्याने विचार सुरू केल्याचे सांगितले जाते. या काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अनेकदा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली.
सुरुवातीला संबंधित खासदारांना थेट भाजपमध्ये घ्यायचे की शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश द्यायचा, यावरून महायुतीत बराच काळ संभ्रम होता. सूत्रांच्या माहितीनुसार, काही खासदारांची भाजपमध्ये जाण्याची इच्छा असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शिंदे यांच्या शिवसेनेतच सामील करून घेण्याची भूमिका घेतली. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय नेतृत्वाशीही चर्चा केल्याचे सांगितले जाते.
एप्रिलमध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या मोहिमेसाठी एकनाथ शिंदे यांना हिरवा कंदील दिल्यानंतर हालचालींना वेग आला. सुरुवातीला पाच खासदारांना आपल्या बाजूला वळविण्यात यश आले. मात्र, संख्याबळ वाढविण्यासाठी आणखी एका खासदाराची आवश्यकता असल्याने ही जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
यानंतर फडणवीस यांनी संबंधित सहाव्या खासदाराशी संपर्क साधून त्याचे मन वळविले. त्याच्या राजकीय भवितव्याची जबाबदारी घेण्याचा शब्द दिल्यानंतर हा तिढा सुटला, अशी माहिती समोर येत आहे.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यात या घडामोडींना वेग आला आणि ‘ऑपरेशन टायगर’ पूर्णत्वाला गेले. त्यानंतर सहा खासदारांनी दिल्ली गाठून लोकसभा अध्यक्षांकडे पत्र सादर केल्याचे वृत्त आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर संबंधित पक्षांकडून अधिकृत भूमिका आणि पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.