रायगडाच्या पायथ्याशी प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन (फोटो - टीम नवराष्ट्र)
रायगड : प्रहार दिव्यांग क्रांती संस्था व प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने दिव्यांग व शेतकरी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आले आहे. प्रहार नेते बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आजपासून (21 मार्च) दिव्यांग मंत्रालयाचे माजी आमदार बच्चू कडू हे अन्नत्याग आंदोलन करत आहे. त्यांचे हे तीन दिवस अन्नत्याग आंदोलन रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनावेळी संयोजक व प्रहार जनशक्ती पार्टीचे सचिन साळुंखे, ओंकार साळुंखे, प्रहार अपंग क्रांती संस्थेचे महाराष्ट्र सचिव सुरेश मोकळ, राज्याध्यक्ष धर्मेंद्र सातव तसेच राज्यभरातील दिव्यांग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.
यावेळी बोलताना माजी आमदार बच्चू कडू म्हणाले, “आज देशात आणि राज्यात धर्म आणि जातीपातीचे घाणेरडे राजकारण केले जात आहे. सरकारला नागरिकांच्या मूलभूत गरजांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना पोट असते आणि त्याकरिता सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. औरंगजेबाने त्याच्या काळात जेवढे लोक मारले नसतील, त्यापेक्षा अधिक लाखो शेतकऱ्यांनी राज्यात सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या केल्या आहेत. परंतु त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. औरंगजेबाने तलवारीच्या टोकावर लोकांना मारले. मात्र, सध्याचे राज्यकर्ते हे त्यांच्या विविध धोरण, कलमाने मारत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने धर्म, जात यावर राजकारण करण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत,” अशी मागणी माजी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिका करा
बच्चू कडू पुढे म्हणाले, “सर्वत्र महागाई वाढलेली असून दिव्यांगांना मागील चार महिन्यापासून कोणतेही मानधन मिळत नाही. त्यांचे जीवन असह्य झाले आहे. याबाबत सरकार कोणतीही दखल घेताना दिसत नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा शेतीच्या शेतमालास योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी देखील हवालदिल झालेला आहे. लाडकी बहीण नाममात्र असून, राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी, मजूर, दिव्यांग, कामगार यांच्यासाठी कोणतीही विशेष तरतूद न करता केवळ अनुदान कपातीचे धोरण आखले जात आहे. दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्यात येऊन १४०० कोटींची तरतूद करण्यात आली. मात्र, त्यापैकी १२०० कोटी रुपये केवळ पगारावर खर्च केले जात आहे. मुबलक निधी नसेल, तर दिव्यांग मंत्रालय कशाप्रकारे काम करणार हे सरकारने स्पष्ट करावे, असे स्पष्ट मत माजी मंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.
पुढे ते म्हणाले की, श्रम, मूल्य आधारित मोबदला लोकांना मिळत नसून, केवळ राजकीय लाभासाठीच्या योजना सध्या सुरू आहे. औरंगजेबाची कबर, दिशा सालियान प्रकरणातून नेमका कोणाचा फायदा होणार? त्यामुळे निरर्थक गोष्टी दाखवण्यापेक्षा योग्य गोष्टी दाखवल्या तर लोकांना समाधान मिळेल. औरंगजेबाच्या कबरीबाबत राजकारण प्रसारमाध्यमातून दाखवले जाते, पण सामन्यांचे हाल कोणाला दिसत नाही. याचे प्रसारमाध्यमांनीदेखील भान ठेवावे. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात दंगल होते. याबाबत त्यांना खरेतर शरम वाटली पाहिजे. परंतु त्याबाबत कोणतीही खंत व्यक्त न करता ते याबाबतचेच राजकारण करत असल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे किमान थोडी लाज वाटून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे.”अशा शब्दांत बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रहारचे नेते सचिन साळुंखे म्हणाले, “स्वराज्याच्या राजधानीवरून राज्याच्या राजधानीला इशारा देण्यासाठी हे प्रतीकात्मक आंदोलन आहे. दिव्यांगांना, कर्जमाफी, त्यांना दरमहा ६००० रुपये मानधन, स्वतःचे घर व स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी, स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना स्टॉल, दिव्यांगांसाठी राष्ट्रीय बँक निधी, दिव्यांग उद्योजकांसाठी धोरण, प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन, अर्थसंकल्पात दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आहे. तसेच २३ मार्च रोजी शहीद दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले आहे.” अशा मागण्या सचिन साळुंखे यांनी मांडल्या आहेत.