अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराज वादग्रस्त विधान केले (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. रोज नवीन मुद्द्यांवरुन राजकारण रंगते आहे. आज राज्याचा अर्थिक अहवाल सादर होणार आहे. मात्र त्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब हे चर्चेत आले आहे. अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणे माझा देखील छळ झाला असल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे.
छावा चित्रपट हा देशभरामध्ये धुमाकूळ घालतो आहे. तसेच बलिदान मास सुरु असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहिली जात आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी त्यांची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसोबत केली आहे. यामुळे सत्ताधारी आमदारांनी गदारोळ घातला आहे. व.;धान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी शिवसेना ठाकरे गट न सोडल्याचे सांगत आमचा देखील संभाजी महाराजांप्रमाणे छळ झाला असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले अनिल परब?
संभाजी महाराजांचा विचार, वारसा कोणी चालवला असेल तर ‘छावा’ बघा आणि मलापण बघा. धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि माझा पक्षा बदलावा म्हणून छळ झाला. ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स… चांगलचं आहे ना, मी पण तेवढाच कडक आहे ना..! ते राऊत साहेब गेले, थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो. माझ्यावरती अन्याय आणि अत्याचार झाले आहेत, मी सगळं भोगलेलं आहे, पण मी देखील त्यांचा वारसा जपणारा आहे, त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला. मी पक्ष बदलला नाही, याचा मला अभिमान वाटतो. जे पक्ष बदलून गेले, ते आता आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा सांगत आहे, असे वक्तव्य अनिल परब यांनी केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार अनिल परब यांनी शिवसेना न सोडण्याचे कारण सांगताना शिंदे गटावर जोरदार घणाघात केला. मात्र यावेळी त्यांनी स्वतःची तुलना छत्रपती संभाजी महाराजांसोबत केल्यामुळे आता राजकारण तापले आहे. या विरोधात सत्ताधारी आमदारांनी आवाज उठवला आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदार हे आंदोलनाला बसले असून अनिल परब यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. यावेळी प्रवीण दरेकर, चित्रा वाघ आणि इतर सत्ताधारी आमदार उपोषण करत होते. अनिल परब यांनी माफी मागावी आणि अनिल परब यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यापूर्वी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी देखील छत्रपती संभाजी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाचे कौतुक केले. ते म्हणाले की, “देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे. औरंगजेबाने त्याच्या काळात अनेक मंदिरं बांधली होती. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता. त्या काळातील लढाई ही धर्मासाठी किंवा हिंदू-मु्स्लीम अशी नव्हती,” असे अबू आझमी यांनी सांगितले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादाला तोंड फुटले आहे. जोरदार टीका झाल्यानंतर अबू आझमी यांनी त्यांच्या वक्तव्यावरुन ‘यू टर्न’ घेतला आहे.