
मोठी बातमी ! सुनेत्रा पवार यांना पुन्हा शपथ घ्यावी लागणार? वकिलाचे थेट राज्यपालांनाच पत्र
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सध्या त्या उपमुख्यमंत्री आहेत. असे असताना सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वर्ध्याच्या एका वकिलाने हा शपथविधीच घटनाबाह्य ठरवला आहे. इतकेच नाहीतर त्यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहून या वकिलाने सुनेत्रा पवारांना पुन्हा नव्याने पद आणि गोपनीयतेची शपथ देण्याची मागणी केली आहे.
वर्ध्याचे वकील हर्षवर्धन गोडघाटे यांनी यासंदर्भात राज्यपालांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी हा शपथविधी बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. मंत्र्यांशी संबंधित तरतुदींशी निगडित असलेल्या भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १६४ नुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करत असतात. इतर मंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यपाल करत असतात. राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ते पद धारण करतील. तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या स्वरूपानुसार, कोणताही मंत्री पदभार स्वीकारण्यापूर्वी राज्यपाल त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील, अशी तरतूद आहे. संविधानाच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये मंत्र्यांच्या पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा नमूना दिलेला आहे.
दरम्यान, शपथविधी समारंभादरम्यान सुनेत्रा पवार यांनी दोनदा सांगितले की, त्या उपमुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेत आहेत, जे असंवैधानिक आणि भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. भारतीय संविधानात कुठेही उपमुख्यमंत्री या पदाची तरतूद नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ आपोआपच बेकायदेशीर ठरते.
मंत्र्यांसाठीच्या तरतुदीनुसार शपथ घेणे घटनासंमत
सुनेत्रा पवार यांनी भारतीय संविधानाच्या तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेल्या स्वरूपानुसार, म्हणजेच मंत्र्यांसाठी असलेल्या शपथेनुसार शपथ घ्यायला हवी होती. त्यामुळे ही शपथ घेऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या खात्यासाठी जबाबदार राहिले पाहिजे. अन्यथा, महाराष्ट्रासारख्या राज्यात भारतीय संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीच उघडपणे संविधानाचे उल्लंघन करत आहेत, असा संदेश जाईल.
राजभवनात जाऊन घेतली शपथ
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. अजित पवार यांच्या जाण्यानंतर उपमुख्यमंत्रिपद रिक्त झाले. या सगळ्या घडामोडीनंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मुंबईत राजभवनात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेत्या म्हणून सुनेत्रा पवारांची पक्षाच्या बैठकीत पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
हेदेखील वाचा : Baramati Plane Accident: बारामती विमान अपघातप्रकरणी अरविंद सावंतांची मोठी मागणी; तांत्रिक त्रुटींकडेही वेधलं लक्ष