सुनेत्रा पवारांचा 'लेटरबॉम्ब'! अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीत वर्चस्वाचा नवा संघर्ष
या “लेटरबॉम्ब”मुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. पक्षातील वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर दबाव वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
या पत्रामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत सत्तासघर्षं पुन्हा उफाळून आला आहे. यापूर्वी रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर पक्ष ताब्यात घेण्याचा आरोप केला होता, त्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांचे हे पाऊल अधिकच महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान, या पत्रामागील नेमका उद्देश काय, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादीतील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पत्रानुसार, पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन २६ फेब्रुवारी २०२६ रोजी वरळी (मुंबई) येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे पार झाले होते. खासदार, आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. पक्षाच्या घटनेतील एक दुरुस्तीदेखील एकमताने मंजूर करण्यात आली. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कागदपत्रांमध्ये राष्ट्रीय अधिवेशनाचा तपशील, निवडून आलेल्या सदस्यांची यादी आणि पक्षाच्या घटनेची प्रत यांचा समावेश आहे.
या पत्रानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्ता संतुलनात बदल होण्याच्या चर्चा तीव्र झाल्या आहेत. या निर्णयामुळे पक्षाच्या अंतर्गत समीकरणांवर परिणाम होऊ शकतो आणि ज्येष्ठ नेत्यांच्या वर्चस्वाला आव्हान दिले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. परिणामी, महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय लढाई पाहायला मिळू शकते.






