पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील निकाल धक्कादायक; उच्च न्यायालयात अपील करणार – तानाजी जाधवर
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी न्यायालयाच्या निकालाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत हा निर्णय धक्कादायक असल्याचे म्हटले आहे.
तानाजी जाधवर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितले की, न्यायालयाने दिलेला निकाल स्वीकारणे कायद्याच्या चौकटीत आवश्यक असले तरी या निर्णयाशी सहमत होता येणार नाही. तब्बल दोन दशकांहून अधिक काळ चाललेल्या या बहुचर्चित खटल्यात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने पवनराजे निंबाळकर यांच्या समर्थकांमध्ये निराशा आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे.
“कोर्टाने जो निकाल दिला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. न्यायालयाचा निर्णय प्रत्येकाला मान्य करावाच लागतो आणि आम्हीही तो स्वीकारत आहोत. मात्र न्याय मिळविण्याची लढाई येथे संपलेली नाही. या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात येणार असून न्यायालयासमोर सर्व बाबी प्रभावीपणे मांडल्या जातील,” असे जाधवर यांनी स्पष्ट केले.
निकाल लागताच ओमराजे निंबाळकर यांचं मोठं वक्तव्य, ‘पोलीस, सीआयडीवर प्रचंड दबाव..,’
ते पुढे म्हणाले की, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण हे केवळ एका व्यक्तीच्या हत्येपुरते मर्यादित नसून त्याच्याशी अनेकांच्या भावना आणि न्यायाची अपेक्षा जोडलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात सत्य बाहेर यावे आणि न्याय मिळावा यासाठी शेवटपर्यंत संघर्ष सुरू राहील.
मुंबई सत्र न्यायालयाच्या निकालानंतर जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली असून पुढील काळात उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या अपिलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना (उबाठा) पक्षानेही न्यायालयीन लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केल्याने या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील निकालानंतर समर्थकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत असून न्याय मिळविण्यासाठी कायदेशीर पर्यायांचा अवलंब करण्याची मागणी जोर धरत आहे.
‘शिंदे गटात जाण्याबाबत निर्णय..,’ कोर्टाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर घेणार मोठा निर्णय






